Mahesh Tapase
Mahesh Tapase sarkarnama
मुंबई

अजित पवारांना भाषणबंदी; हा तर भाजपकडून महाराष्ट्राचा अपमान...महेश तपासे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देहु येथील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलून देण्यात आले नाही. हा भाजपने महाराष्ट्राचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज देहु येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

अजित पवार यांना राज्यातील शेतकऱ्यांचे, कास्तकर्‍यांचे त्याचप्रमाणे वारकऱ्यांचे देखील प्रश्न माहीत आहेत. पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी कार्यक्रम होत असताना महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हा अपमान जाणुनबुजुन करण्यात आला का? हा महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रकार होता का? असे अनेक प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत.

नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळी त्यांनी देशांतील युवकांना एक वचन दिले होते. प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी युवकांना दिले होते. त्यानुसार आठ वर्षात त्यांनी १६ कोटी युवकांना नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. पण, प्रत्यक्षात १६ कोटींचा आकडा आता दहा लाखांवरच आला आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की की मोदी सरकार नोकऱ्या देण्यास अपयशी ठरले आहे. आता देशाची अवस्था बिकट असून त्यांचे वचन हे निवडणूक जिंकण्याचा फंडा होता, अशी टीका श्री. तपासे यांनी केली आहे.

देशातील सर्व प्रमुख पदांसाठी निवडणूक होत असते, त्यावेळी सर्व पक्षांना वाटते की शरद पवार हे राष्ट्रपती पदावर विराजमान व्हावेत. १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. महत्वपूर्ण पदाच्या निवडणूक ही सर्व समावेशक असावी. देशाचा राष्ट्रपती कोणत्या पक्षाचा नसतो, तो संविधान रक्षक , सैन्य दलाचा प्रमुख व भारतीयांचा पालक असतो. ममता दिदीने दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही निमंत्रित केलेले आहे. त्यामुळे या बैठकीस पवार साहेब जाणार आहेत, असेही श्री. तपासे यांनी सांगितले.

देशात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद व रणनिती पवार साहेबांकडे आहे, असे अनेक नेत्यांना वाटते. आगामी काळात देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून त्यांचे नेतृत्व श्री. पवार यांनी करावे, असे आम्हालाही वाटते. पण, हा निर्णय कोणता एक पक्ष घेऊ शकत नाही. हा निर्णय सर्व विरोधी पक्षियांनी एकत्र बसून घेतला पाहिजे. याबाबत आजपर्यंत कधीही चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यावर याविषयी सांगितले जाईल, असेही श्री. तपासे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT