Jitendra Awhad, Anand Paranjape News Sarkarnama
मुंबई

Thane Politics : ठाणे राष्ट्रवादीत भडका; परांजपेंनी आव्हाडांना सुनावले

राहुल क्षीरसागर

Thane News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला प्रत्यक्ष हजर होते, त्यांच्या समोरच अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवार अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकूमशहासारखा पक्ष चालवला, असा आरोप केला होता. त्या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उत्तर दिले होते, त्यावेळी ते पत्रकार परिषदेत भावुक झाले होते. त्यावरून राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आव्हाडांचा चांगलाच समाचार घेतला.

परांजपे म्हणाले, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी राजीनामा दिला होता तेव्हा आम्हालादेखील अश्रू अनावर झाले होते. पवार साहेबांबाबत आमच्याही आदरयुक्त भावना आहेत. मात्र, आम्ही डोळ्यात सारखे अश्रू आणून आमच्या भावना व्यक्त करत नाहीत, असा टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जो ही उमेदवार असेल त्यांच्या मागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही माझी भूमिका आहे. निवडणुकीत पडणारी मते ही पक्षाची ताकद असतात. पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन, असेही परांजपे म्हणाले. काटई, कोनगाव व खारघर टोल नाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोल नाक्यांवरील लहान चारचाकी एमएच ०४ या ठाण्यातील वाहनांची त्वरित टोलमुक्ती करून महायुती सरकारने ठाणेकर जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे परांजपे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी मनसेचे अविनाश जाधव यांच्या उपोषणाला भेट देत, उपोषण करणे हे आपले काम नसल्याचे सांगितले. आता राज ठाकरे हे टोलसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. ज्यावेळी अविनाश जाधव हे टोलप्रश्नावर साखळी उपोषणाला बसले होते. त्याचवेळी मी म्हटले होते की, जाधव यांची ही नेहमीची सवय आहे. काहीतरी नाटकीय आंदोलन करायचे, कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे, प्रसिद्धीचा स्टंट करायचा आणि कुठल्याही लॉजिकल एण्डला आंदोलन जाईल, असे कधीच पाहायचे नाही.

मी त्याहीवेळेस अविनाश जाधव यांना विनंती केली होती. राज ठाकरे नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले तर याच्यातून काहीतरी तोडगा निघू शकतो. २०१० पासून ते २०२६ पर्यंत टोलचा करार एमईपीएलबरोबर आहे. दर तीन वर्षांनी १ ऑक्टोबरला पाच रुपये हे टोलमागे वाढविले जातात. मागच्यावेळी १ ऑक्टोबर २०२० ला पाच रुपये टोलमागे वाढविले गेले होते. २०१० पासून टोलवाढीची ही प्रक्रिया सुरू आहे. यातून जर खऱ्याअर्थाने काही मार्ग काढायचा, जनतेला टोलमुक्त करायचे असेल, तर एमएससीआरडीएचे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने मुख्यमंत्र्यांना जर राज ठाकरे भेटले, तर काही मार्ग निघू शकेल हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT