Ajit Pawar-Narayan Rane Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politic's : 'अजित पवारसाहेब तुमच्यात धमक आहे, टाका पुढचं पाऊल, आम्ही तुमच्यासोबत आहोत';दादांना कोणी दिला सल्ला?

Narayan Rane Advice To Ajit Pawar : किती जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं, त्यातील किती लोक कार्यक्रमाला आले. नुसतंच महाराष्ट्र माझा. तुम्हे कुठे आहोत, तुमचे योगदान काय? योगदान सांगायला काम, कार्य, कर्तृत्व दाखवावं लागतं.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 04 May : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-2025’ या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांसह महाराष्ट्रातील प्रमुख नेतेमंडळींना सुनावले. मुंबईतील मराठी माणूस आज कुठे गेला? उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कोठे आहे? या कार्यक्रमाचं किती लोकांना निमंत्रण दिलं होतं? त्यातील आले किती? असे प्रश्न मांडतानाच मराठी माणसासाठी अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे. घ्या सगळ्यांना बरोबर. पुढचं पाऊल टाका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आवाहनही राणेंनी केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे. संयुक्त महाराष्ट्र १९६० मध्ये अस्तित्वात आला, तेव्हा मुंबईत मराठी माणूस हा ५२ टक्के होता, आज तो २२ टक्क्यांवर आला आहे. मराठी माणसाची ही अधोगती, आपण एवढे मुख्यमंत्री झाले, मग ही मराठी माणसं गेली कुठे? याचा शोध घ्यावा. त्याच्यात आपण कुठे कमी पडलो. त्यात मीही आहे. हे आपण पाहिले पाहिजे. कुठे गेला हा मराठी माणूस.

आम्हाला प्रगतीशील महाराष्ट्र (Maharashtra) घडवायाचा आहे, असे आपण नेहमी म्हणत असतो. आज आपल्या देशात दरडोई उत्पन्नात गोवा, सिक्कीम, तमीळनाडू, गुजरात, कर्नाटक आपल्या पुढे आहेत. आपल्या लोकांचं उत्पन्न वाढावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्याचा निर्धार केला होता. गेल्या ३३३ वर्षांत आपण तो घडवला का? आपल्या हातून का नाही झालं, याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे. सत्तेवर बसल्यावर लेाक अभिनंदन करतील. पण, इतिहासात आपला काय उल्लेख होईल, याचाही विचार करायला पाहिजे, असे खडे बोल नारायण राणेंनी सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्यात महाराष्ट्र कुठे हे आपण पाहिले पाहिजे. १९६० मध्ये महाराष्ट्राचं पर कॅपिटल इनकम हे ५६० होते. हे सर्वाधिक होते. आज पर कॅपिटल इनकम सुमारे अडीच लाख आहे. तरीही आपल्या पुढे आहेत. या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल, असे धोरण हवे. उद्योगधंद्यात आज मराठी माणूस कोठे आहे? याचाही विचार व्हा, असे आवाहन राणेंनी केले.

राणे म्हणाले, महाराष्ट्रातील उद्योग, नोकऱ्या याबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. पहिले सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा व्हायाची. राज्याचा, जनतेचा विचार त्यात व्हायचा. आता असं काहीच होत नाही. किती जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं, त्यातील किती लोक कार्यक्रमाला आले. नुसतंच महाराष्ट्र माझा. तुम्हे कुठे आहोत, तुमचे योगदान काय? योगदान सांगायला काम, कार्य, कर्तृत्व दाखवावं लागतं.

अजित पवार साहेब तुमच्यात धमक आहे. घ्या सगळ्यांना बरोबर. मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आणि मागे का, याचं कधी तरी आत्मपरीक्षण करा. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा. एकत्र येण्याची हाक द्या. नाही आले तर सोडून द्या. जशी आज हाक दिली ना, तशी हाक द्या. हे तुमचं पहिलं पाऊल आहे. पुढचं पाऊल पडू द्या. कोणी नाही आलं तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आवाहन राणेंनी अजित पवारांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT