Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Budget: शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,हा अर्थसंकल्प म्हणजे...

सरकारनामा ब्यूरो

Assembly Budget Session: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी ( दि. ९) अर्थसंकल्प मांडला. यावेळी फडणवीसांनी विविध महत्वपूर्ण घोषणा केल्या. मात्र, यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. यावेळी शिंदे फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचा हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, या सरकारने फक्त भरीव निधीची घोषणा केली. मात्र, त्यात बोलणाऱ्यांच्या वाणीला आणि ऐकणाऱ्यांच्या काळजाला बरं वाटावं अशा घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत.

मागील अर्थसंकल्पात आमच्या विकासाची पंचसूत्री आम्ही मांडली होती. आता यांनी पंचामृत म्हणून आणलं आहेत. मुळात अमृत कुणी पाहिलेलं नाही. तसं विकासाचं पंचामृतही आता दिसणारही नाही. स्वप्नांच्या दुनियेत फक्त जनतेला फिरवून आणण्याचं काम या सरकारच्या अर्थसंकल्पात झालं आहे अशी टीकाही पवार यांनी केली.

पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्राबाहेर जे काही उद्योगधंदे चालले आहेत ते थांबविण्यासाठी कोणतीही तरतदू नाही. विकासकामांना निधी खर्च होत नाही. नुसत्या घोषणा करायच्या अशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे. महापुरुषांच्या स्मारकांना, कामांना निधी देण्याच्या घोषणा या सरकारने केल्या पण किती निधी दिला याबाबत ठोस असं काही निर्णय घेतलेला नाही.

पुण्यातील रिंगरोड, पुणे, पिंपरीतील प्रस्तावित मेट्रोप्रकल्प, विमानतळ हे अर्थसंकल्पात रिपीट झालेलं आहे. तसेच पुरंदर,कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, शिर्डीचं विमानतळ, रेल्वेबाबत आम्ही करणार असं जाहीर केलं आहे.यात करणार म्हणजे नेमकं काय करणार यावर काहीच भाष्य केलेलं नाही. या सगळ्यांना मिळून आम्ही भरीव तरतूद करणार म्हणजे नेमकं काय करणार हे काहीच जाहीर केलेलं नाही.

शेतकऱ्यांच्या वीजपंपाची माफीची मागणी आम्ही सरकारमध्ये असताना फडणवीसांनी केली होती. पण या संकल्पात त्याचा साधा उल्लेखही नाही. मात्र,येत्या १ एप्रिलपासून तीस ते पस्तीस टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. याची घोषणा हा अधिवेशन संपल्यावर करण्यात येणार असल्याचंही पवार म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची तुटपुंजी मदत करणार आहेत. पण ही तुटपुंजी मदत करुन त्यांची थट्टा करत आहेत का असा सवालही त्यांनी केला. पण अर्थसंकल्पात आकडा नाही तर भरीव तरतूद केल्याचं सांगितलं आहे.

त्याचमुळे फडणवीसांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचे इमले, चुनावी जुमले आहे. घोषणांचा सुकाळ असल्याचा हल्लाबोलही अजित पवारांनी यावेळी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT