Amit Shah- Devendra Fadnavis-Chandrasekhar Bawankule-Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Amit Shah Tour : अमित शहांचा दौरा म्हणजे फडणवीस, बावनकुळेंसाठी एक प्रकारचा सिग्नल; जयंत पाटलांचा निशाणा

Vijaykumar Dudhale

Mumbai, 24 september : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शाह हे विभागानिहाय भाजप पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टिपण्णी करताना ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी विभागनिहाय बैठका घेणे म्हणजे राज्यात भाजप नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी एकच प्रकारचा सिग्नल आहे,’ असा दावा केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज विदर्भ आणि मराठवाड्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी ते उद्या बुधवारी चर्चा करणार आहेत. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची (BJP) जबाबदारी ज्या नेतृत्वावर आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमी असल्यामुळेच अमित शाह हे प्रत्येक विभागनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न अमित शाह हे करत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

अमित शाह यांनी विभागानुसार बैठका घेणे हा देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांना एक प्रकारचा सिग्नल आहे, असं मला वाटतं. किती जागा पडणार, याचा अमित शाह हे या बैठकीतून आढावा घेतील, अशी खिल्लीही जयंत पाटील यांनी उडवली.

हर्षवर्धन जाधव यांच्याशी आमचा संपर्क झालेला नाही. त्यांनी पक्षांतरासाठी मुहूर्त काढला असेल तर मला माहित नाही. पितृपंधरवाड्याच्या आधी बरेच जण यायला लागले आहेत. आमचा त्यांचा काही संपर्क झाला नाही. ते आमच्याकडे येण्याची काही शक्यता मला तरी वाटत नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगून टाकले.

पाटील म्हणाले, गोकुळ झिरवळ यांनी लावलेले बॅनर म्हणजे त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झालेली नाही. तशी काही आमची चर्चा संपर्क झालेला नाही. त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे, पण पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला नाही.

तसेच, ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांची भेट घाईघाईने झाली. ते तिथे पूजेसाठी आले होते. मी दर्शनासाठी गेलो होतो. ती भेट म्हणता येणार नाही. फक्त आमची नजरा नजर झाली, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील म्हणाले, मालवणमध्ये २० कोटी रुपये खर्चून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. त्याबाबत जयंत पाटील म्हणाले, घाई गडबडीने काहीतरी लोकांचं समाधान करण्याचं हा प्रयत्न आहे. जे नुकसान झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान कोसळल्यावर स्वाभिमान कोसळला, असे आम्ही समजतो. त्याचं प्रायश्चित त्यांना घ्यावंच लागेल.

मालवणमधील शिवछत्रपतींच्या पुतळ्याची नव्याने उभारणी करण्याचं काम घाई गडबडीत करू नये. त्यांच्या सवयी एवढ्या वाईट आहेत की पुतळ्यातही लोकं पैसे खातात, त्यांनी आता पुतळा उभारण्याचा उद्योग करू नये. आमचं सरकार आल्यावर आम्ही अतिशय योग्य उत्तम पुतळा उभा करू, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT