Amit Thackeray Sarkarnama
मुंबई

Amit Thackeray : ''...तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला... पुरा’ होईल'' ; अक्षय शिंदे एन्काऊंटरवर अमित ठाकरेंचं विधान!

Mayur Ratnaparkhe

Amit Thackeray on Badlapur Case : बदलापूरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती, शिवाय सर्वचस्तरातून संतापही व्यक्त केला गेला. बदलापूरातील नागरिकांनी रेलरोको आंदोलनही केले होते. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक केली गेली होती आणि दोनच दिवसांपूर्वी त्याने गुन्हाही कबूल केला होता. त्यानंतर आज संध्याकाळी त्याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. यावर अमित ठाकरेंनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार अक्षयने पोलिसांचं बंदूक हिसकावून घेत तीन गोळ्या झाडल्या यानंतर पोलिसांकडून झालेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला, असं सांगितलं जात आहे. शिवाय यामध्ये एक पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे. आता घटनेवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. बदलापूरात तर फटाके वाजवून आणि पेढेही वाटले गेले. तर विरोधकांनी मात्र पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आता याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

अमित ठाकरे(Amit Thackeray) यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी नुकतीच वृत्तवाहिन्यांवर पाहिली. एन्काऊंटर कसा झाला, कोणी केला, यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता, पहिला विचार जो आला, तो एकच - त्या पीडित मुलींना अखेर न्याय मिळालाच...'

तसेच 'या विषयावर विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी, नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने भूमिका मांडतील. एन्काऊंटरच्या निमित्ताने सरकारला कोंडीत पकडण्याचेही प्रयत्न होतील. अक्षय शिंदे पोलिसांवर हल्ला करूच शकत नाही, पोलिसांनीच कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला, असे अनेक तर्कवितर्क लढवले जातील. परंतु, जो माणूस लहान मुलींवर अत्याचार करतो, त्याची बाजू कोणी कशी काय घेऊ शकतं?' असा सवाल अमित ठाकरेंनी केला आहे.

'असो, मला त्या विषयाच्या खोलात जायचे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आणि त्या पक्षामध्ये काम करणाऱ्यांची वेगवेगळी राजकीय विचारधारा असू शकते. मुळात मला आपल्या सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे वेधायचे आहे की, महाराष्ट्रात आजपर्यंत अशाप्रकारचे अत्याचार लहान मुलींवर किंवा महिलांवर कधी झाले नव्हते. महिला आणि मुली महाराष्ट्रात पूर्णपणे सुरक्षित होत्या.

परंतु, अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात मग सरकार कोणाचेही असो, महिला सुरक्षेबाबत उदासीनता नेहमीच दिसून आली आहे. बदलापूर प्रकरणातसुद्धा अजूनपर्यंत संस्थाचालक फरार आहेत, त्यांना अटक होऊन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही का झाली नाही, याचे उत्तर गृहमंत्री आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिलेच पाहिजे.' असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

याशिवाय ‘शक्ती कायदा’, जो महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात पास झाला आहे, त्याला अद्यापही दिल्लीतून मंजुरी मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही पक्षातर्फे करतच आहोत. परंतु, इतर राजकीय पक्षांनी याबाबत महाराष्ट्राच्या दोन्ही सदनांमध्ये सरकारला जाब का विचारला नाही, याचा विचार कोणी केला आहे का? की फक्त महिलांवर अत्याचार झाल्यावर त्याचे राजकारणच करत बसणार आहेत?' असं अमित ठाकरेंनी विचारलं आहे.

'मागच्या वेळी सुद्धा राजसाहेबांनी महिलांवरील अत्याचारासंदर्भात ‘शरिया’सारखे कायदे महाराष्ट्रात लागू झाले पाहिजेत, तरच अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा बसेल, असे स्पष्ट मत मांडले होते. शाळेतील पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहे. या अगोदरही या शाळेत अशीच काही प्रकरणे घडली आहेत का? शाळा कोणाच्या मालकीची आहे? संस्थाचालक राजकीय पक्षाशी निगडित असल्याने त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही का? असे अनेक प्रश्न उभे राहतात.

अक्षय शिंदेसारख्या नराधमाला त्याने केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली आहेच, परंतु ज्या शाळेत अत्याचार घडले, त्या शाळेच्या संबंधित संस्थाचालक आणि या गुन्ह्यांत सामील असलेल्या इतर व्यक्तींनाही कडक शासन झालेच पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचललीच पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला... पुरा’ होईल.' अशा शब्दांमध्ये अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT