Amol Kolhe Ajit Pawar
Amol Kolhe Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Amol Kolhe : अमोल कोल्हे आले अजितदादांच्या मदतीला धावून!

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे आता भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप व शिंदे गट अजित पवारांच्या विरोधात आता चांगलंच आक्रमक झालेला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अजित पवारांविरोधात आंदोलनही होत आहे. या सगळ्या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (amol Kolhe) अजिततदादांच्या मदतीला धावून आले आहेत.

व्हिडीओ शेअर करत कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर यावर त्यांचे मत मांडले आहे. “औंरगाजेबाने आदिलशाही, कुतूबशाही नेस्तानाबूत केली. त्याने स्वत:च्या बापाची हत्या केली. सख्ख्या भावांचीच कत्तल केली. यामुळे हे धर्मयुद्धापेक्षा ही सत्तेच्या वर्चस्वाची लढाई होती. काबूलपासून ते बंगालपर्यंत ज्याची सत्ता होती, त्या औरंगाजेबला ८ वर्ष दख्खनच्या भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांनी फरफटायला भाग पाडलं होतं. यामुळे ते धर्मयुद्ध होत नाही. जर संभाजी महाराजांना धर्मवीर बिरुदावली लावली तर त्यांचे शेवटचे दिवस म्हणजे, कैदेपासून बलिदानाच्या काळापर्यंतच मर्यादित ठेवते,” असं अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे.

“संभाजीराजांना स्वराज्यरक्षक हीच बिरुदावली जास्त व्यापक असे ठरते. कारण - महाराजांनी वयाच्या ९ व्या वर्षापासून स्वराज्य यासाठी त्याग केलेला आहे. शिवाजी महाराज यांचं निधन झाल्यानंतर पाच-पाच आघाड्यांवर मात करत महाराजांनी स्वराज्य अबाधित राखलं. यामुळे याकडे धर्म असं पाहण्यापेक्षा महाराजांच्या तत्कालीन इतिहासाचा विचार जर केला, तर याकडे देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींचाही परिपाक होता, तो म्हणजे स्वराज्य,” असे स्पष्ट मत अमोल कोल्हेंनी मांडले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वक्तव्य केले होते. अजित पवार म्हणाले, “ छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आपण नेहमी स्वराज्यरक्षक असाच करतो. मात्र महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, मात्र काही जण जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर असा करतात,” असे अजित पवार यांनी म्हंटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT