Ashish Shelar, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : राज ठाकरेंच्या भेटीनंतर शेलार म्हणाले, 'त्यांना साद घालायला गेलो...'

Chaitanya Machale

Mumbai News : राजकारणात भेटी होत असतात, आम्ही राजकीय मित्र आहोत. याचा अर्थ राज ठाकरे (Raj Thackeray) यांना साद वगैरे घालायला गेलो नव्हतो, याचा कोणताही संबध लावण्याची गरज नाही, असे भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी स्पष्ट केले. शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे निवडणुकीत भाजपला साथ देण्याची साद घालण्यासाठीच ही भेट घेण्यात आल्याची चर्चा सुरू होती, त्यावर शेलार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीबाबत शेलार यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, राजकारणात गाठीभेटी या होतच असतात. तशीच ही भेट होती. ठाकरे यांना साद घालण्यासाठी वगैरे काही ही भेट नव्हती. या भेटीमध्ये नक्की काय झाले, याचा खुलासा योग्यवेळी केला जाईल. राजकारणात काही गोष्टी या समजून घ्यायच्या असतात. काँग्रेसची सध्याची स्थिती बिकट असून, आपल्या राजकीय भवितव्यासाठी आणि देशाच्या विकासाला प्राधान्य दिले जात असल्याची परिस्थिती असल्याने आगामी काळात मोठ्या संख्येने खासदार, आमदार, नगरसेवक भाजपमध्ये येणार आहेत. यामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच इतर पक्षांच्या सदस्यांचा समावेश असणार आहे. राज ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या भेटीची माहिती पुढील काळात समोर येईल, असे स्पष्ट करत शेलार यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वरळी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवरून या भागातील आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना शेलार यांनी आव्हान दिलं आहे. ठाकरेंवर निशाणा साधत 'हिंमत असेल तर द्या राजीनामा आणि या वरळीत आमच्यासमोर' असे शेलार म्हणाले. आपल्या 'एक्स' अकाउंटवरूनदेखील शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे करतात. तेथील एसआरएचे प्रकल्प 20 वर्षांहून अधिक काळ रखडले आहेत. तुमच्या काळात तर येथे एक वीटदेखील रचली गेलेली नाही. वरळी गावठाण, कोळीवाड्यातील जनतेचे कोरोना काळात अतोनात हाल झाले हे सर्वांनी पाहिले आहे. कोस्टल रोडच्या खांबांमुळे वरळीच्या कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला ते टाहो फोडत होते, तेव्हा पालकमंत्री असलेल्या ठाकरे यांना कोळी बांधवांना भेटायलासुद्धा वेळ नव्हता, असा मजकूर त्यांनी पोस्ट केलेला आहे.

आपले बळ आहे, तेवढेच बोलावे

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. ते मुंबईसह राज्यभरात महानिष्ठा महान्याय निमित्ताने दौरे करत असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करीत आहेत. यावरदेखील आशिष शेलार यांनी टीका केली आहे. आपले बळ किती त्यानुसार बोलले पाहिजे. ज्यांना वरळीमध्ये काम करता आले नाही. ते राज्यातील विविध भागात दौरे करत विरोधकांवर टीका करत आहेत. वरळीतील जनता दुर्बीण घेऊन त्यांचा शोध घेत आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशी, गावठाण कोळीवाड्यातील नागरिक त्रस्त आहेत. एसआरएमध्ये झालेला भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर कधी बोलणार. तुम्ही भाजपच्या जिवावर निवडून आलेला आहात. निवडणुकांची खुमखुमी असेल तर राजीनामा द्या, महायुतीसमोर निवडणुकीला तयार राहा, असे आव्हानच त्यांनी दिले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT