Devendra Fadnavis On BabaSaheb indu Mill Smarak Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : इंदू मिल स्मारक 'या' तारखेपर्यंत पूर्ण होणार! फडणवीसांनी थेट डेडलाईनच सांगितली, पाहा काय म्हणाले...

Indu Mill Memorial Devendra Fadnavis Announces Completion Deadline : मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल स्मारक कधी पूर्ण होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट डेडलाईन जाहीर केली. कामाच्या प्रगतीचा ताज्या अपडेट जाणून घ्या.

Rashmi Mane

मुंबईतील इंदू मिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम वेगाने पुढे जात आहे. स्मारकाच्या बांधकामापैकी सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम नियोजनबद्ध पद्धतीने झाले तर पुढील महापरिनिर्वाण दिनी स्मारकाचे लोकार्पण करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री यांनी स्मारकाबाबतचे काम समाधानकारक वेगात सुरू असल्याचे सांगितले.

राज्यातील नव्या सरकारने पुतळा संघर्ष समितीच्या मागणीचा विचार करून समन्वय समिती स्थापन केली आहे. स्मारकातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या पुतळ्याच्या उभारणीसाठी येत्या पावसाळ्यापर्यंत आवश्यक ढाचा उभारण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. कोणत्याही अडचणी न आल्यास पुढील महापरिनिर्वाण दिनी या भव्य स्मारकाचे लोकार्पण शक्य असल्याचे स्मारक समितीने स्पष्ट केले.

शंभर फुटांचा पायथा आणि त्यावर तब्बल 350 फूट उंचीचा कांस्य धातूपासून तयार होणारा पुतळा अशी संपूर्ण रचना असणार आहे. प्रवेशद्वार, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह आणि वाहनतळ या सर्व सुविधांची स्ट्रक्चरल कामे पूर्ण झाली असून अंतर्गत सजावटीची तसेच बाह्य परिसरातील कामे जोरात सुरु आहेत.

पुतळ्यासाठी लागणाऱ्या पोलादापैकी सहा हजार टन पोलादाचा अंदाज आहे. त्यापैकी 1400 टन पोलाद साइटवर आले असून 650 टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचेही मोठे काम पूर्ण झाले असून पुतळ्याच्या बुटांच्या पॅनेलवरील सूक्ष्म तपशीलही उत्तम प्रकारे दिसू लागले आहेत.

मुंबईतील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या कार्याची आणि दृष्टीचीही आठवण करून दिली. समाजातील तीव्र विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी विषमतेलाच शक्ती बनवत ज्ञान मिळवले आणि देशाला मार्गदर्शन केले, असे ते म्हणाले.

भारताचे पहिले वीजमंत्री म्हणून बाबासाहेबांनी राष्ट्रीय वीज ग्रीडची संकल्पना मांडली आणि राबवली. त्यामुळे देशभरात कुठूनही कुठेही वीज पोहोचवणे शक्य झाले. आजही अमेरिकेसारख्या प्रगत देशात ही संकल्पना नसताना बाबासाहेबांनी त्या काळात ही दूरदृष्टी दाखवली, असे फडणवीस यांनी सांगितले. देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम असून प्रत्येक समस्येचे उत्तर या संविधानात आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT