Bachchu Kadu Sarkarnama
मुंबई

Bacchu Kadu On Exit Poll Result : एक्झिट पोल म्हणजे थोतांड, बच्चू कडू कडाडले !

Chaitanya Machale

Bacchu Kadu News : राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी ४ जूनला जाहीर होणार आहे. या निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानांवरुन विजयाचे अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोल विविध संस्थांकडून जाहीर करण्यात आले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा विजयी होतील, असा अंदाज या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. एक्झिट पोल म्हणजे थोतांड असून त्यावर माझा विश्वास नाही, अमरावतीची जागा आम्हीच जिंकणार, असा दावा कडू यांनी केली आहे.

एक्झिट पोलवर मला काही विश्वास नाही. त्यामध्ये बरेचसे चुकीचे अंदाज असतात. आठ ते दहा लाख मतदान झाले. त्यातील दोन-तीन हजार लोकांना विचारले म्हणजे एक्झिट पोल होत नाही. त्यामुळे या पोलवर कोणीही विश्वास ठेवू नये, आता घोडा मैदान जवळच आहे. दोन दिवसातच निकाल कळणार आहे. अमरावतील लोकसभा मतदारसंघातून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हेच विजयी होणार, असा विश्वासही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी असलेल्या घटक पक्षांना भाजपने (BJP) विश्वासात घेतलेच नाही. निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनी सगळ्यांना विचारात घेऊन गेले असते तर बरं झाले असते. पण त्यांची भूमिका सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची नव्हती. म्हणूनच आम्ही विरोधात उभं राहिलो. अमरावतीमधून आमचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहे. दोन दिवसातच निकाल येणार असल्याचे कडू म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या मदतीने लढणार या प्रश्नाला उत्तर देताना कडू म्हणाले,कोणतीही भूमिका आम्ही काही एकटे जाहीर करत नाही. आमचे काही मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांना घेऊन आम्ही पंधरा ते वीस जागा निश्चितपणे लढविणार आहोत. कोणासोबत जायचं की नाही जायचं ते कार्यकर्त्यांना घेऊन ठरवू त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 400 पारच्या घोषणेवर बोलताना कडू म्हणाले, आम्हाला 400 पारची चिंता नाही. तर शेतकऱ्याचं काय होईल याची चिंता आहे. घरकुलाचे पैसे अजून भेटले नाहीत. सरकार कोणाचं पण येऊ दे, पण शेतकरी आणि सामान्य माणसाचं भलं होऊ दे, हीच आमची मागणी आहे. कांद्याचे भाव वाढले, निर्यात बंदी केली. सोयाबीनचे भाव पडले, तुरीचे भाव पडले, कापसाचे भाव हजार रुपयाने कमी झाले. ऐन निवडणुकीच्या काळात शेतीमालाचे भाव पडले. हे व्हायला नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार फेल झालं, शेतकऱ्यांची लूट झाली. या लुटीमधून ही अर्थव्यवस्था उभी आहे, अशी टीकाही कडू यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT