Bachchu Kadu Sarkarnama
मुंबई

Bachchu Kadu : आमचे दोन आमदार आले तरी मुख्यमंत्र्यांना झुकावं लागेल; बच्चू कडूंचा आक्रमक बाणा

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्व राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची मोट बांधणी सुरू झालेली आहे. यात सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटास प्रहार पक्षाचा पाठिंबा आहे.

असे असले तरी विधानसभेत आमचे दोन आमदार आले तरी सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना आमचे ऐकावे लागेल, असे सूचक विधानच माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना महाविकास आघाडीत मंत्रीपद भूषवणाऱ्या बच्चू कडू यांनी साथ दिली. त्यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागले अशी आशा त्यांना होती. मात्र तसे काही झालेले नाही. त्यातच त्यांनी सरकारकडे केलेल्या अनेक मागण्यांकडेही दुर्लक्ष केल्याचे प्रकारही घडले आहेत. परिणामी बच्चू कडू यांनी वारंवार सरकारला टोले लगावले आहेत.

आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. त्यानिमित्त कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत सूचक विधान केले. देशात फक्त 8 खासदारांवर देवेगौडा पंतप्रधान झाले होते. तसेच राज्यात आमचे 2 आमदार जरी आले तरी, मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल, असे म्हणत कडूंनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बच्चू कडू Bachchu Kadu म्हणाले, मी कोणाचा गुलाम नाही, जे खरं ते खरं, खोटं ते खोटं, अशी माझी भूमिका असते. ऑनलाइन पत्ते खेळले तर गुन्हा होत नाही, पण खुल्या पद्धतीने पत्ते खेळले तर गुन्हा होतो. हे अजबच आहे. आम्ही ऑनलाइन पत्ते विरोधात 10 जुलै रोजी आंदोलन करणार आहोत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळच पत्ते खेळून आंदोलन करू, असा इशाराच कडू यांनी सरकारला दिला आहे.

सरकार शेतकऱ्यांना सोबत कधी पाहणार नाही. त्यांनी सामान्यांच्या हातात हिरवा, काळा, निळा झेंडा दिला आहे. तुमच्या सारखीच शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. शेतकऱ्याला सर्व डुबलेलं दिसतं त्यामुळे तो आत्महत्या करतो. मंत्रालयातील सहा मजले दुरुस्त करावे लागते, सर्व ठीक होते. महाराष्ट्रातील परिस्थिती तशीच सुधारेल, असा टोलाही कडूंनी शिंदे सरकारला लगावला आहे.

9 ऑगस्टला एक ते दीड लाख लोकांसोबत छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत. तिथून आमच्या विधानसभा निवडणुकीची सुरुवात असेल. आम्ही कोणासोबत आहोत हे वेळ ठरवेल, मुख्यमंत्री आमच्यासोबत असतील की आम्ही त्यांच्यासोबत ते बघू, असे म्हणत बच्चू कडूंनी भविष्यातील भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

सध्या राज्यात विधानपरिषदेची निवडणूक सुरू आहे. 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे तीन असे एकूण 12 उमेदवारी रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरसीची होणार आहे. प्रहारचे बच्चू कडू आणि राजकुमार पटले असे दोन आमदार आहेत. याबाबत बच्चू कडूंनी, विधान परिषदेसाठी आमची दोन मते निर्णायक असणार आहे. आमच्या दोन्ही मतांसाठी मी मुख्यमंत्री शिंदेंचा कॉल घेणार आहे, असेही स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT