Monsoon Session Sarkarnama
मुंबई

Maharashtra Monsoon Session : थोरातांचे पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस-पवारांना चिमटे; ‘त्यांना खातेवाटप करायचं आहे, दिल्लीला जायचं आहे...’

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : पावसाळी अधिवशेनाला विरोधकांच्या गोंधळताच सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला (भाजप, शिंदे आणि पवार गटाला) चिमटे काढले. राज्यात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती भयावह आहे. मात्र, सरकारचे त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे, खातेवाटप करायचे आहे. दिल्लीला जायचे आहे, अशा शब्दांत थोरातांनी शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis)-पवारांना टोमणे लगावले. (Balasaheb Thorat pinched Shinde-Fadnavis-Pawar on the first day)

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (ता. १७ जुलै) सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नव उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि इतर मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली. काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळून लावल्याने पहिल्या अर्ध्या तासातच गोंधळाला सुरुवात केली.

थोरात म्हणाले की, सध्या राज्यात पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे. निम्म्या राज्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे वीस टक्क्यांच्यावर पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे नुकनसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आमच्या नगरच्या पालकमंत्र्यांनी पारनेरमध्ये जाऊन आठ दिवसांत मदत देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो शब्दही पाळला गेला नाही.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. बोगस बियाणे, खते मोठ्या प्रमाणात बाजारात आलेली आहेत. काही टोळ्या सरकारी टोळ्या असं दाखवून हप्तेवसुलीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात करत आहेत.ही परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे. सरकारचं या परिस्थितीकडं अजिबात लक्ष नाही. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे, खातेवाटप करायचे आहे. दिल्लीला जायचं, यायचं आहे. या सर्व प्रकारांमुळे त्यांचं महाराष्ट्राकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे.

आज गंभीर आणि तातडीची परिस्थिती आहे, त्यामुळे स्थगन प्रस्ताव मी मागितला असून विधानसभेचे सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी, अशा माझा आग्रह आहे, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार, त्यानंतर अजित पवार गटाची युतीबरोबर हातमिळवणी, शपथविधी आणि खातेवाटप याची राज्यात चर्चा सुरू आहे, त्यावर थोरात यांनी शिंदे-फडणवीस-पवार या तिघांना टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT