Maharashtra politics news : राज्यातील नगरपालिका निवडणुकीनिमित्ताने महायुती जवळपास वेगवेगळे लढताना दिसले. यातच महायुतीमधील भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत, जास्तच वाॅर रंगला. शिवसेना नेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला.
यात सिंधुदुर्गमधील मालवण नगरपालिकेतील पैसा वाटपावरून शिंदेंचे आमदार नीलेश राणेंनी भाजप घेरलं. त्यामुळे या संघर्षाला अधिकच फोडणी बसली. नगरपालिकेचं पहिल्या टप्प्यातील मतदान झालं आहे. शिंदे अन् चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्षावर तोडगा काढण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पुढाकार घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबईत रवींद्र चव्हाण अन् एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षावर बोलताना प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "रवींद्र चव्हाण यांच्याबाबत बोलायचे झाले, तर त्यांची आणि एकनाथ शिंदे यांची खूप जुनी मैत्री आहे. दोघांनी खूप वर्षे एकत्र काम केलेले आहे. दोघांचे कार्यक्षेत्र एक आहे. शिंदे हे आता महाराष्ट्राचे नेते आहेत; पण मूळ कोकणातले कार्यक्षेत्र ठाणे जिल्ह्यातच आहे. त्यामुळे अनेक वेळा वादाचे मुद्दे येतात. पण, मला विश्वास आहे आता निवडणुका संपल्यावर दोघे पुन्हा एकत्र जेवतील आणि सगळे विषय संपतील."
'निश्चितच अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात ते संपतील. कारण दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे. रवींद्र चव्हाण यांनाही शिवसेना (Shivsena) नेता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदरच आहे. चव्हाण यांचे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. कुठल्याही तणावात न येता काम करणार ते व्यक्तिमत्त्व आहे. मी देखील त्यांना बोललो आहे, की ते आमचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपल्या अभिव्यक्तीवर कधी-कधी नियंत्रण ठेवायला हवे,' असा सल्ला चव्हाण यांना फडणवीस यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या तणावावर बोलताना, देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दोन भावांची मतं नेहमी वेगवेगळीच असतात. ते कधीच एक होत नसतात. दोन्ही भाऊ आपापली मत प्रखरतेने मांडू शकतात अन् मांडत देखील असतात. त्याच पद्धतीने आमचंही काही-काही वेळा एक मत होत नाही." सगळ्या गोष्टींमध्ये एक मत झालं असतं, तर आम्ही वेगवेगळ्या पक्षात कशाला राहिला असतो, एकच पक्षात राहिला असतो. आम्ही तिन्ही वेगवेगळे पक्ष आहोत, मत मतांतर आहेत. पण बॉर्डर इश्यूवर आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्रित राहणार आहोत, असेही फडणवीस यांनी म्हटले.
'नगरपालिका निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपण प्रत्येक गोष्ट कार्यकर्त्यांवर लादू शकत नाही. नेत्यांच्या निवडणुका आल्यावर कार्यकर्ते राब राब राबतात, त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आणि त्यांच्या निवडणूक आल्यावर मात्र आपण बाजूला व्हायचं, हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही तिन्हीही पक्षांनी आपापल्या पातळीवर निवडणूक लढण्याचं ठरवलं. यातून कार्यकर्त्यांच्या भावना जपण्याचा आम्ही प्रयत्न केला. नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र आलो, तर आम्ही तिघेही काही ठिकाणी वेगळं लढलो,' असेही फडणवीस यांनी म्हटले.
नगरपालिका निवडणुकीत भाजप अन् शिंदे एकत्र होतो, तर कधी भाजप अन् पवार, कधी शिंदे अन् पवार एकत्र होते. सगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स आम्ही या निवडणुकीत पार पाडली. महापालिकेची निवडणूक वेगळी आहे. ती देखील कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. परंतु तिथं काही मोठे निर्णय असतात, ते थेट राज्याशी संबंधित असतात. त्यामुळे तिथं आम्ही मात्र जवळपास एकत्र येण्याचा निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.