Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
मुंबई

सात मार्च, सात मार्च, सात मार्च : चंद्रकांतदादांनी इतके वेळा हे सांगितलय की काहीतरी घडणारच!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : दिशा सालियानच्या (Disha Salian) मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे सुद्धा स्पष्ट होईल. याबरोबरच महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) अनेक नेते हे तुरूगांत जातील. मात्र, सात मार्चनंतर याबाबत कारवाई होईल, असा इशारा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंगळवारी (ता.22 फेब्रुवारी) कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलतांना आघाडीच्या नेत्यांना दिला. पण हे सर्व सात मार्चनंतर घडेल, असे पाटलांनी अनेकवेळा सांगितले. यामुळे या तारखेनंतर नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काही दिवसांपुर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यावंर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यानंतर हा वाद वाढतच जात असून अद्यापही शमलेला नाही. आता या वादात चंद्रकात पाटलांनीही उडी घेतली असून आज कोल्हापूरात त्यांना दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी राजकारण होतेय का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला यावर पाटील म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध–पाणी का पाणी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे, अश्या शब्दात पाटलांनी शिवसेनेला डिवचले.

महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून त्यांना पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला पाटलांनी यावेळी दिला.

पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेणे आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ ची जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा प्रचंड छळ केला. अखेरीस त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलिसांचा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वापर करण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. आम्ही याच्याविरोधात लढा देऊ. जनताही अशा लोकांना धडा शिकवेल, अश्या शब्दात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT