Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ आक्रमक; केंद्रासह राज्य सरकारच्या दडपशाहीचा हिशेबच केला, म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Chhagan Bhujbal Attack On Government : ओबीसी समाजासह राज्यातीस प्रत्येक लहान घटकासोबत उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत प्रवास केला आहे. मात्र सध्या केंद्र सरकारकडून देशभारत दडपशाही सुरू आहे. राज्य सरकारही त्याच मार्गावर असल्याचा हल्लाबोल करून राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देशातील दडपशाहीचा हिशेबच केला. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रमा मुंबईत येथे बुधवारी (ता. २१) पार पडला. यावेळी छगन भुजबळ यांनी आक्रमक होत राज्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधला. छगन भुजबळ म्हणाले," निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचा प्रकार सुरु केले जात आहे. मुख्यमंत्र्याबद्दल कुणी काही बोलले तर चार तासात कारवाई होते. मात्र महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर गलिच्छ शब्दात लिखाण करून त्यांच्यावर गुन्हा नोंद होतो, मात्र कुठलीही कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. शालेय शिक्षणातून धडे वगळले जात आहे. शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला केवळ एक पान दिले जाते. तर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या इतिहासाला किती पाने मिळतील, असा प्रश्न पडतो."

यावेळी त्यांनी भाजपने परंपरेला गालबोट लावल्याचीही टीका केली. भुजबळ म्हणाले, वारकऱ्यांना मारहाण केली जात आहे. ३५० वर्ष परंपरा असणाऱ्या वारकऱ्यांना मारहाण केली जाते. आज राज्यात हिंदू-मुस्लिम वाद घडविण्याचे काम सरकारप्रणित संघटनांमार्फत केले जात आहे. औंरगजेबाचे उद्दातीकरण केले जाते, मात्र कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम समाजासह सर्वांना पोटाशी धरले होते."

आता धर्मसत्ता राज्यापेक्षा मोठी होत असल्याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, "अलिकडच्या काळात धर्मसत्ता ही राजसत्तेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची संसद ही पुरोगामी असली पाहिजे, मात्र 'सेंगोल'ची स्थापना करून लोकशाहीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालला पाहिजे."

यावेळी भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. देशाचे आणि राज्याचे मुख्य प्रश्न मागे पडत असल्याचीही खंत व्यक्त केली. देशात आणि राज्यात डबल इंजिन सरकार अशा घोषणा दिल्या जातात, मात्र तिकडे बेलासोरमध्ये तीन इंजिन एकावर एक धडकून अपघात झाला. मात्र नैतिकता म्हणून राजीनामा आला नाही. या देशाचे एक महत्वाचे राज्य असलेल्या मणिपूरमध्ये गेले चार महिने जाळपोळ सुरू आहे. केंद्र सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. पंतप्रधान अमेरिकेत जातात मात्र मणिपूरमध्ये जात नाहीत, असाही घणाघात भुजबळ यांनी यावेळी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT