Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

CM Shinde On Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा समाजातील तरूण उचलतायत टोकाचं पाऊल; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''माझ्या भावांनो..."

Ganesh Thombare

Mumbai News: आरक्षणाच्या मुद्यांवरून सध्या राज्यभरातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने, निर्वाणीचा इशारा दिलेला आहे.

तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठीच मराठा समाजातील तरूण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मागील तीन दिवसात तीन मराठा तरूणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मराठा समाजाच्या आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका मांडत, मराठा समाजातील तरूणांना कळकळीची विनंतीही केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "ही अतिशय दुख:द घटना आहे. मराठा समाजाच्या मुलाने आत्महत्या करणे हे त्याच्या परिवारासाठी आणि आमच्यासाठीही वेदनादायी आहे. कारण, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रालाच आपला परिवार समजतो. त्यामुळे ज्या आत्महत्या झाल्या आहेत, ते अतिशय दुर्दैवी आहेत. माझी सगळ्यांनाच विनंती आहे आणि एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी कटीबद्ध आहे आणि सगळे प्रयत्न करत आहे".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर "मराठा समाजातील माझ्या भावांनो मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतोय, टोकाचं पाऊल उचलू नका. धीर धरा थोडा वेळ द्या. या सगळ्या गोष्टी होताय आणि होतील. आपल्या कुटुंबाचा मुलाबाळांचा थोडा विचार मराठा समाजातील तरूणांनी केला पाहिजे. सरकार म्हणून मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटीबद्ध आहोत. ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते आम्ही नक्की करणार आहोत," असंही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिलं.

'... त्यामुळे 'ही'बाब दिलासादायक '

याशिवाय "मागील युती सरकारमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात टिकलं. परंतु दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झालं.

आता त्यासंदर्भात मी खोलात जाऊ इच्छित नाही, परंतु ज्या बाबी आहेत, त्या न्यायालयासमोर मांडता आल्या नाहीत. ज्या त्रूटी न्यायालयाने दाखवल्या, की मराठा समाज मागास असताना तो मागास असल्याचं सिद्ध करताना थोडं अपयश आलं आहे. म्हणून आम्ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे.

सुदैवाने १३ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या पीठाने ही पुनर्विचार याचिका दाखल करून घेतली आहे आणि म्हटलं आहे की, आम्ही या मराठा आऱक्षण प्रकरणी लक्ष घालतो आहोत. त्यामुळे ही बाब दिलासादायक आहे, मराठा समजाला आधार देणारी आहे.

त्यामुळे सरन्यायाधीशांसमोर मागील वेळी जी तथ्ये मांडाता आली नाहीत. ती आपले तज्ज्ञ वकील सर्वोच्च न्यायालयासमोर मांडतील. त्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी खिडकी उघडली आहे. ही दिलासादायक बाब आहे," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT