Mumbai News : महाराष्ट्राचं राजकारण ज्या काही प्रमुख मोजक्या राजकीय नेत्यांभोवती फिरतं,त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचाही समावेश होतो. या दोन ठाकरें बंधूमध्ये गेल्या 20 वर्षांपासून विस्तवही जात नाही. तसेच हे दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. पण आता शनिवारी (ता.19) ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. आणि यावेळी महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव आणि राज ठाकरेंनी या दोघांकडूनही टाळी-प्रतिटाळी देण्यात आल्याचंही दिसून आलं.आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22 वा मुंबई लाइव्ह इंडोस्कोपी 2025 पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मोजक्याच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,“बघा जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचे कारण नाही. फक्त मला वाटतं की माध्यमं त्यावर जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट बघा. ते एकत्र आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू,” अशी भूमिका फडणवीस यांनी यावेळी मांडली.
तसेच ऑफर देणारे हे, प्रतिसाद देणारे ते यावर मी काय बोलणार आहे. त्यावर तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजे असं म्हणत पुन्हा एकदा सीएम फडणवीसांनी युतीचा चेंडू ठाकरे बंधूंच्या कोर्टात ढकलला. याचवेळी त्यांनी निवडणूक महानगरपालिकेची असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचाच त्यात विजय होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याशी युती होऊ शकते,असं म्हणताना आमच्यातील भांडणं फार छोटी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही,आमच्या भांडणं छोटी, पण महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हटलं होतं.
यानंतर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावावर भाष्य करताना राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे.आपल्याकडून भांडणं नव्हतीच,पण जे काही असतील तीही ती मिटवून टाकली, असं देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.पण आपल्यासोबत जाऊन महाराष्ट्राचा फायदा आहे की भाजपसोबत जाऊन ते आधी ठरवा,असा इशाराही ठाकरेंनी राज ठाकरेंना दिला होता.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं असून राजकीय वर्तुळात त्या विधानाची चर्चा रंगली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोघांची काय मतं आहेत? याची मला कल्पना नाही. मात्र दोघांनी एकत्र यायला हवे अशी अनेकांची इच्छा आहे.
2014 मध्ये त्यांना एकत्र येण्याची संधी चालून आली होती. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांत तुम्ही आम्ही कल्पना केली नाही, असे घडले आहे. मात्र, लगेच असे काही होईल असे वाटत नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत. दोघे एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल असं भुजबळांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.