Sharad Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : पवारांच्या बोचऱ्या टीकेला फडणवीसांचे कडवे उत्तर; म्हणाले, "गोवारी हत्याकांड..."

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांबाबत आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केल्यानंतर वातावरण तापले आहे. याचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटू लागले असून वाहनांची जाळपोळ केल्याच्याही घटना घडल्या आहेत. याची उच्च पातळीवर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.

दरम्यान, शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर गरज नसतानाही पोलीस बळाचा वापर केला. आंदोलकांवर गृहविभागाच्या आदेशानुसार लाठीचार्ज झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केला. यावर तुम्ही आरक्षणासाठी काय केले, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जशास तसे उत्तर दिले. तसेच गोवारी हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित करून पवारांवर पटलवार करायलाही फडणवीस विसरले नाहीत. (Latest Political News)

पवारांनी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला. ते म्हणाले, मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरू होते. पोलिसांनी त्यांना आंदोलन थांबवण्यास सांगितले होते. मात्र अचानकच पोलिसांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांबाबत पोलीस बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, लोक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी," असे सांगत पवारांनी थेट फडणवीसांवर हल्लाबोल केला.

शरद पवार पुढे म्हणाले, “राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. हे चित्र जालन्यात दिसले आहे. यात पोलिसांना काय दोष देणे योग्य नाही. ते आदेशाचे गुलाम असल्याने आलेल्या सूचनांचे त्यांनी काटेकोर पालन करून आपली कामगिरी बजावली. याची पूर्ण राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी आहे." या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबले नाही, तर मला त्या ठिकाणी जाऊन लोकांना धीर द्यावा लागेल", असेही पवारांनी सांगितले.

शरद पवारांनी (Sharad Pawar) जहरी टीका केल्यानंतर फडणवीस यांनीही जशाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीस म्हणाले, "कालपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही, असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांची आज अचनाक भूमिका बदलल्याची दिसून आली. ते म्हणू लागले सरकारने हे जाणीवपूर्वक केले का? सरकाराला एका समाजाबद्दल आकस आहे का? आता माझ्या त्यांनाच सवाल आहे, की त्यांनी मराठा समाजासाठी काय केले? किंवा त्या समाजाच्या आरक्षणासाठी काय केले? हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे", असे थेट आव्हान फडणवीसांनी दिले.

फडणवीसांनी गोवारी हत्याकांडाचीही पवारांना आठवण करून दिली. "पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झाले. त्यावेळी ११३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यावेळी ते पाहायलाही गेले आणि राजीनामाही दिला नाही. आता या परिस्थितीत त्यांचे काही लोक आमच्यासोबत सत्तेत आले आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत, चिडलेले आहेत, व्यथित आहेत. यातूनच ते असे आरोप करतात. ते मोठे नेते आहेत. मी त्यांना उत्तर देणार नाही."

"आम्ही ते लोक आहोत ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. ते टिकवून ठेवले. त्यांच्या सरकारमध्ये हे आरक्षण सुप्रिम कोर्टात गेले. मुख्यमत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षणाबाबत एक समिती गठीत केली असून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कटीबद्ध आहोत, अशी ग्वाहीही फडणवीसांनी दिली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT