Umakant Agnihotri
Umakant Agnihotri Sarkarnama
मुंबई

मोदींचा अहंकार उतरवण्यासाठी उत्तर भारतीय यूपीच्या नातेवाईकांना एक लाख पत्र पाठवणार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईतील उत्तर भारतीय हे कोरोना काळात आपल्या गावी आल्याने उत्तर भारतात कोरोना (Covid-19) पसरला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला होता. यावर आता मुंबईतील उत्तर भारतीयांकडून प्रतिक्रिया येत असून मोदी यांच्यावरील नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात महाराष्ट्राने साथ दिली व लाखो लोकांना गावी पाठवण्यास मदतही केली. मात्र, महाराष्ट्र व उत्तर भारतीयांचा मोदींनी अपमान करुन स्वाभिमानाला ठेच पोहचवली. यामुळे आमचा स्वाभिमान दुखावणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा अहंकार उतरवण्यासाठी मुंबईतील उत्तर भारतीय आपल्या गावातील नातेवाईकांना एक लाख पत्र पाठवणार आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करणार आहेत, असे प्रदेश काँग्रेस (Congress) उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री (Umakant Agnihotri) यांनी सांगितले आहे. ते आज (ता.13 फेब्रुवारी) टिळक भवन येथे कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या उत्तर भारतीय सेल प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्हा अध्यक्षांचा पदग्रहण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

अग्निहोत्री म्हणाले, महाराष्ट्राने उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देऊन सर्व सुरक्षा व सुविधा दिली. कोरोना काळात महाराष्ट्राने साथ दिली व लाखो लोकांना गावी पाठवण्यास मदतही केली. परंतु महाराष्ट्र व उत्तर भारतीयांची मोदींनी अपमान करुन स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. उत्तर प्रदेश आई तर महाराष्ट्र आमची मावशी आहे. ज्या मोदींनी आमच्या स्वाभिमान दुखावला त्यांचा अहंकार आम्ही उतरवू. मुंबईतील उत्तर भारतीय आपल्या गावातील नातेवाईकांना एक लाख पत्र पाठवणार आहेत. या पत्रातून उत्तर भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत, अश्या शब्दात अग्निहोत्री यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पटोले म्हणाले, महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक रोजगारासाठी येत असतात. उत्तर भारतीयांनी मुंबईसह महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कष्ट, मेहनत करून ते आपले पोट भरतात व गावातील घरच्यांनाही आर्थिक मदत करतात परंतु उत्तर भारतीय व महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला म्हणून पंतप्रधान मोदींनी केलेला अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. काँग्रेस पक्ष सदैव उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला आहे.

टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्हा अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांच्यासह उत्तर भारतीय सेलचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. यापूर्वीही काही राजकीय पक्षांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोरोना पसरवला, असा आरोप महत्वाच्या पदावरील व्यक्तीने करुन त्यांचा अपमान केला. कोरोना काळात महाराष्ट्रातून ८४२ रेल्वेच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केले आहे. पण भाजपाकडून महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना बदनाम करण्याचे काम केले, अशी टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT