Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
मुंबई

आमदारांच्या घरांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आमदारांना मुंबईत घरं देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घोषणेनंतर वाद निर्माण झाला आहे. ही घरं मोफत दिली जाणार असल्याची चर्चा सुरूवातीला होती. पण नंतर सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं असून म्हाडाच्या (Mhada) कोट्यातून सर्वसामान्यांप्रमाणेच आमदारांनाही घरं दिली जाणार आहेत. ही घरं मोफत नसतील, असं सांगण्यात आलं. पण आता या वादानंतर हा निर्णय रद्दही केला जाऊ शकतो, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

मुंबई माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आमदारांना घरं देण्याच्या घोषणेबाबत चुकीचा मेसेज केला. ज्या आमदारांची मुंबईत घरं नाहीत, त्यांनाच म्हाडाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही घरं मोफत नसतील. म्हाडाची घरं देताना लकी ड्रॉ काढून लोकांना दिली जातात. त्याच पध्दतीने लोकप्रतिनिधी, पत्रकार, खेळाडू अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचाही समावेश होता. कालांतरानं ही योजना बंद झाली. मात्र, म्हाडाला काही टक्के लोकांना घरं देण्याचा अधिकार आहे.

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाल्याने हा निर्णय थांबवलाही जाऊ शकतो. तसा विचार केला जाऊ शकतो. याबाबत मी खात्री देऊ शकत नाही. पण म्हाडाने ठरवलेल्या किंमतीतच घरे दिली जातील. पण विरोध होत असेल तर त्याचा विचार केला जाईल. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असे पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एसटी कामगारांना ठणकावलं

एसटी (ST strike) कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. जे कर्मचारी कामावर रुजू होतील, त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत केली आहे. त्यावर बोलताना अजित पवार यांनीही कामगारांनी कामावर येण्याचे आवाहन केले. एसटीचं (MSRTC) विलीनीकरण होणार नाही. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंत्रिमंडळानं स्वीकारला आहे. त्यात सुचवलेल्या गोष्टी मंत्रिमंडळान पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचारी रुजू न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कठोर कारवाई म्हणजे, निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवी भरतीही केली जाऊ शकते, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना निर्बंधांवर आज निर्णय

गुढीपाडवा सणानिमित्त कोरोना (Covid 19) निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन शोभायात्रांना परवानगी मिळणार की नाही, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ही बैठक आज दुपारी चार वाजता आहे, असं अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतील. उद्यापासून नवीन नियमावली लागू केली जाऊ शकते, असे संकेतही पवारांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT