Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis on Thackeray : '' महाराष्ट्रातले खरे गद्दार तर उध्दव ठाकरेच...''; देवेंद्र फडणवीसांचा तिखट बाण

सरकारनामा ब्यूरो

Kalyan News : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बोलवत होती. भाजप-शिवसेनेच्या युतीला जनतेने पू्र्ण बहुमत दिले. त्यावेळी हिंदुत्वाकरिता मतं मागितली होती. पण, निवडणूक झाली आणि उद्धव ठाकरे यांची नियत बदलली. खुर्चीकरिता विचारांशी गद्दारी ही उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपच्या मतांवर निवडून आले. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेससोबत गेले. गद्दार कुणाला म्हणायचे असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही आहात, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे कल्याण येथील भाजपच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंवर घणाघात केला. फडणवीस म्हणाले, हे बघा सत्ता कशी असते २०१९ ला उध्दव ठाकरेंनी मोदींच्या नावावर मतं मागितली. पण ऐनवेळी त्यांनी तुम्ही आम्हांला लोटलं असं ठाकरे म्हणाले, पण तुम्हांला ती सत्तेची खुर्ची आ जा आ जा करत बोलवत होती. तुम्हीही आ रहा हूँ आ रहा हूँ असं म्हणत होता असा टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.

राज्यात भाजपा शिवसेने( Shivsena) ची युतीला पूर्ण बहुमत मिळालं होतं. शिवाजी महाराज, मोदींच्या नावावर मतं मागितली होती. त्यानंतर युतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर त्यांची नियत बदलली. त्या्ंची विचारांशी सौदा केला. आणि महाराष्ट्रात जर कुणी खरी गद्दारी केली असेल तर ती उध्दव ठाकरेंनी केली. आमच्या मतांवर निव़डून आलात आणि आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमच्याशी गद्दारी करुन सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलात. त्यामुळे खरी गद्दारी जर कुणी केली असेल तर ती उध्दव ठाकरेंनी केली आहे.

आता ज्यांच्यासोबत मतं मागितली होती त्यांच्यासोबत शिंदे परत आले आहेत. ज्या विचारांकरता खासदार, ४० आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मतं मागितली नव्हती. तर भाजप(BJP) सोबत मतं मागितली होती. मोदींचे मोठेमोठे फोटो लावून मतं मागितली. त्यानंतर नियत बदलली, विचारांशी सौदा केला. त्यामुळे तुम्हांला दुसर्यांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही असंही फडणवीस यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. एक काळ असा होता की, मुघलांना जनी काष्ठी पातळी फक्त संताजी धनाजी दिसत होते. तसे ठाकरेंना मोदी शाह दिसतात असंही ते म्हणाले.

मुंबईत वर्धापन दिनाचे दोन सोहळे होत आहेत. एक सोहळा ज्यांनी शिवसेना वाचवली त्यांचा आहे. जे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. आणि दुसरा सोहळा ज्यांनी बाळासाहेबांच्या विचार बुडवला त्यांचा आहे असंही फडणवीस म्हणाले.

मुंबईकरांचा एकही पैसा वाया जाऊ देणार नाही. त्यामुळेच मुंबई महापालिकेतल्या अनियमिततेवर एसआयटीची घोषणाही फडणवीसांनी केला. मुंबईतल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठीच ही एसआयटी स्थापन करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितले.

तुम्ही शिवसैनिकांनाही भेटत नाही

नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत काश्मिरमध्ये तिरंगा लावला. त्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेता. नरेंद्र मोदी हे सीमेवर जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. तुम्ही शिवसैनिकांना भेटायला जात नाही. असा खरपूस समाचारही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा घेतला.

उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्षे कुंभकर्णाचे होते. कारण तुम्ही कुंभकर्णाच्या झोपेतून फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेत. असं आम्ही नव्हे तर तुमच्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, याची आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी काढून दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT