Jayant Patil, Ajit pawar
Jayant Patil, Ajit pawar Sarkarnama
मुंबई

पंतप्रधान मोदी अन् पवारांमधील भेटीनंतर अजित पवार अन् जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागचं नेमकं कारण काय, याबाबत आपल्यालाही पुरेशी माहिती नाही, असं राष्ट्रवादीतील नेते सांगत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भेटीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. (Sharad Pawar Meets PM Modi)

भेटीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पवार साहेबांना सांगितले होते की, निवडून आलेल्या मंत्रिमंडळाने 12 विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्यांची रीतसर नावे दिली आहेत. त्या गोष्टीला काही वर्ष झाली आहेत. आम्ही अनेकदा विनंती करून होत नाही. आमचे वरिष्ठ नेते आपण आहात, म्हणून तुम्हाला सांगतोय. आपण दिल्लीतील वरिष्ठांशी बोलावे असं सांगितलं. कदाचित त्यासाठी ही भेट असावी, असं अजित पवार म्हणाले. जयंत पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड ईडीने जप्त केले आहेत. एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीविरूध्द भाजप असा संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडी अजूनही काही नेत्यांची चौकशी सुरू आहे. सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडूनही तपास यंत्रणाना हाताशी धरून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आघाडीतील नेत्यांकडून केले जात आहेत.

राज्यात या घडामोडी घडत असताना पवारांनी बुधवारी सकाळी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, राज्यातील घडामोडी, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई यांसह अन्य काही मुद्दांवर चर्चा झाल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या केवळ दोन दिवस आधी या दोन्ही सर्वोच्च नेत्यांमध्ये ही भेट झाली आहे. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात ही चर्चा झाली. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर प्रथमच दोन्ही नेते आज भेटले. यामुळे या भेटीचे राजकीय पडसाद उमटणे अपरिहार्य मानले जाते. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार पवार यांनी पंतप्रधानांची झालेल्या चर्चेत राज्याचेही काही प्रश्न मांडले आणि जीएसटी थकबाकी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह काही मुद्दे चर्चेत डोकावले असेही समजते.

मागील वर्षी जुलै महिन्यात पवारांनी मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आठ महिन्यांनी दोन्ही नेते भेटले. या आठ महिन्यांत राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना ईडीने अटक केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य काही नेतेही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊतांसह इतरही नेत्यांची चौकशी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी भेट होत असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

पवारांच्या घरी सर्वपक्षीय नेत्यांचे स्नेहभोजन

पवार यांनी काल सर्वपक्षीय नेत्यांना स्नेहभोजनसाठी आमंत्रित केले होते. सर्वपक्षीय खासदार आणि आमदार पवार यांच्या निवासस्थानी जमले होते. त्यात त्यांच्या एका बाजूला संजय राऊत, तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बसल्याचे छायाचित्रावरून दिसते. दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनी दिल्ली गाठून राज्य सरकारच्या विरोधात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. या साऱ्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी या सर्वोच्च नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने दिल्ली दरबारात तो उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT