Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता तब्बल सव्वा महिना उलटला आहे. ऐतिहासिक यशानंतर महायुतीत नाराजीनाट्याचे एकावर एक पाहायला मिळत आहे. आधी मुख्यमंत्रीपद,मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप,पालकमंत्रिपदं यांचा समावेश आहे. एकीकडे मंत्रिपदासाठी दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्यानं त्यांची नाराजी ओढावली असतानाच दुसरीकडे महायुती सरकारमधील (Mahayuti) नेत्यांचे रुसवे फुगवे अद्यापही सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीला आता 15 दिवस उलटल्यानंतरही अजून एक ना दोन तर तब्बल 20 मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कारभार स्विकारला नसल्याचे मोठी बाब समोर आली आहे. ही सर्व खाती अजूनही आपल्या प्रमुखाच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येत आहे.
महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 39 मंत्री आहेत. महायुतीत गृह आणि अर्थ खात्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र,गृहमंत्रिपद फडणवीसांनी स्वत:कडे ठेवलं तर अजितदादांना पुन्हा अर्थखातं मिळालं. तर शिंदेंकडे त्यांचं नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं.
पण अद्यापही फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारला नसल्याची माहिती समोर आली आहे. आवडीची खाती न मिळाल्याने अद्याप पदभार स्विकारला नसल्याचे सांगण्यात येत आहे. यात भाजपच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले,जयकुमार रावल,आशिष शेलार,अतुल सावे यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या शंभूराज देसाई,भरत गोगावले,गुलाबराव पाटील,दादा भुसे यांच्यासह अनेक मंत्र्याचा समावेश आहे.तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय भरणे,माणिकराव कोकाटे,नरहरी झिरवाळ याही मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.
पदभार न स्विकारलेल्यांपैकी अनेक नेते हे परदेश दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अनेकांच्या वैयक्तिक कारणांमुळे या मंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारला नसल्याचं सांगण्यात येत असून काही मंत्र्यांनी पदभार न स्विकारता कामाला सुरुवात केल्याचंही सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील घटक पक्षात सुरु असलेले नाराजीनाट्य संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. या ना त्या कारणावरून नाराजी पुढे येत आहे. त्यामुळे तीन घटक पक्षांची नाराजी दूर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्ती केली होती. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असतानाच अपेक्षित खातं न मिळाल्यानं दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा आहे.त्यामुळेच त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नसल्याचे बोलले जात आहे.
संबंधित मंत्र्यांनी पदभार न स्विकारण्यामागं अनेक कारणं असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामध्ये काही मंत्री हे परदेश दौऱ्यावर असल्याची चर्चा आहे. तर काहीजणांची संबंधित खात्यावरुन नाराजी आहे. तर अनेकांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या खात्याचा पदभार स्विकारला नसल्याचं समोर येत आहे. पण याचवेळी काही मंत्र्यांनी पदभार न स्विकारता आपल्या कामाला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.