Devendra Fadnavis News : Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : विरोधकांवर टीका करताना फडणवीसांची ‘शब्द’निवड जाणीवपूर्वक की रागाच्या भरात?

Chetan Zadpe

Mumbai News : राजकीय जीवनात सत्तेवर असताना बोलण्याचे काही संकेत पाळले जातात. शब्दांची निवड, शब्दांवर दिला जाणार जोर आणि त्यांचा वापर हे विचारपूर्वक केले गेले पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी जाहीरपणे संवाद साधताना बहुतांश प्रमाणात ही परंपरा जपली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही परंपरा कायम जपली, पण कंत्राटी भरतीवरून राज्यात सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २०) घेतलेल्या पत्रकार परिषदेत वापरलेल्या काही टोकदार शब्दांमुळे वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना विरोधकांवर टीका केली. या वेळी त्यांनी वापरलेले हे शब्द चटकन लक्ष वेधून गेले. आता हे शब्द जाणीवपूर्वक निवडले गेले, की रागाच्या भरात ते ओघवते आले हे खुद्द देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. 'थोबाडं उघडी पाडली पाहिजेत...' 'लाजा का वाटत नाहीत...' "शरम वाटली पाहिजे...' 'तोंड वर करून आमच्यावर आरोप...' 'सगळ्यांना एक्स्पोज करणार...' 'राज्याला अराजकाकडे नेण्याचा प्रयत्न...' 'बुरखा फाडणार...' अशी काही वाक्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत वापरली.

कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. याच मुद्द्यावर आधी काय घडले, हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी कंत्राटी भरतीचे निर्णय या आधीच्या महाविकास आघाडी सरकारनेच घेतले होते. 'त्यावेळी शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद होते. आता हेच नेते आणि त्याचे पक्ष या मुद्द्यावरून आमच्यावर आरोप करत आहेत,' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आधी काय घडले होते आणि कसे निर्णय घेण्यात आले हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेले काही शब्द ऐकून अनेकांचे कान टवकारले. उत्तम संसदपटू आणि वक्ता अशी ख्याती असलेले देवेंद्र फडणवीस शब्द कायम जपून वापरतात. आपल्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, याचा विचार त्यांच्याकडून कायम केला जातो, हे दिसून आले आहे. पण आज देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेले शब्द त्यांच्या आतापर्यंतच्या प्रतिमेला काहीसा धक्का देणारे आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक असे शब्द वापरले का? राज्यात सध्या मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ड्रग्ज प्रकरण या मुद्द्यांवरून राज्यातील सरकारला धारेवर धरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील तरुणांमध्ये असंतोष पसरविण्याचा, राज्याला अराजकतेकडे देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यासाठीच त्यांनी अशी भाषा आणि शब्द वापरले असावेत का, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT