Devendra Fadnavis: अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत आत्तापर्यंत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर जर हा घातपात असेल तर आपण आकाश-पाताळ एक करु आणि सत्य समोर आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी अजित पवारांच्या मृत्यूबाबतही त्यांनी मुद्दे मांडेल.
अजित पवारांच्या मृत्यूबाबत मतमतांतरं असताना एकीकडं हा निव्वळ अपघाती मृत्यू असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. तर दुसरीकडं घातपाताद्वारे अजित पवारांचा मृत्यू ओढवला असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सातत्यानं केला आहे. त्यासाठी त्यांनी आता थेट कर्नाटक पोलिसांत धाव घेत याप्रकरणी झिरो FIR दाखल केला आहे. याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.
यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश-पाताळ एक करु पण जर या केसमध्ये कोणाचा घातपात असेल, यामध्ये कोणाचा बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्र कमी असू शकते. पण इतकी बोथट नाहीए की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कट-कारस्थान करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुडदाही खणून काढू.
कर्नाटकनं जे केलेलं आहे, तुमच्या मनात नसेल पण हे कर्नाटकनं राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात तपास व्यवस्थित चाललेलं नाही, कुठेतरी तपासाला विलंब लावला जातोय, कुठल्यातरी दबावाखाली तपास सुरु आहे, अशा प्रकारची महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकनं हा झिरो एफआयआर नोंदवून घेतलेला आहे, असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला.