Mumbai Dabewala Union Sarkarnama
मुंबई

Mumbai Dabewala Union Demand : फडणवीससाहेब, जबाबदारी ओळखा अन्‌ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्या; मुंबईत डबेवाल्यांची संघटना आक्रमक

Vijaykumar Dudhale

Mumbai News : वारकरी आणि मराठा समाजावर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा आम्ही तीव्र शब्दांत धिक्कार करतो. मात्र, गृहखातं ज्यांच्याकडे आहे, त्या देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील लाठीहल्ल्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबईतील डबेवाले संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली. (Devendra Fadnavis should resign from post of Home Minister: Mumbai's Dabawalas demand)

जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद आज दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्यात जागोजागी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या दादर भागात मराठा समाजाच्या वतीने रविवारी (ता. ३ सप्टेंबर) आंदोलन करण्यात आले. यात मुंबईतील डबेवालेही सहभागी झाले होते. सरकार आणि पोलिसांचा निषेध या आंदोलनाच्या माध्यातून करण्यात येत आहे. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा इशाराही आंदोलकांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

तळेकर म्हणाले की, जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन सुरू होतं. पण त्याच्यावर लाठीहल्ला, आश्रुधूर सोडण्यात आला आणि गोळीबारही करण्यात आला. मागे आळंदीत वारकऱ्यांवर लाठीहल्ला केला, त्यावेळी वारकऱ्यांनी दगडफेक केली नव्हती, तरीही वारकऱ्यांवर हल्ला झाला. आताही जालन्यात पाहिली दगडफेक झाली नव्हती, पहिला लाठीहल्ला झाला, त्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटली असेल. या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो. वारकरी आणि मराठा समाजावर लाठीहल्ला करता. गृहखातं ज्यांच्याकडे आहे, त्यांनी याची जबाबदारी घेऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.

डबेवाला म्हणून आम्ही मुंबईत काम करत असलो तरी आम्ही मावळ भागातून आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही मावळे आहोत, आम्ही मराठा आहोत. आरक्षणाची गरजही आम्हाला आहे. आमच्या आजोबांनी, वडिलांनी आणि आम्हीही डबेवाले म्हणूनच काम करत आहोत. आमच्या मुलांनी डबे वाहू नयेत, असं आम्हाला वाटतं. आरक्षण मिळालं तर आमची मुलं शिकतील. त्यांनाही पुढं नोकऱ्या लागतील. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही मुंबईच्या डबेवाल्याचीही मागणी आहे, असे तळेकर यांनी स्पष्ट केले.

जालन्यातील घटनेला प्रशासन जबाबदार आहे, गृहखातं जबाबदार आहे. गृहखाते मंत्री या घटनेला जबाबदार आहेत, त्यांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सुभाष तळेकर यांनी पुन्हा एकदा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT