Sharad Pawar-Ramdas Athawale
Sharad Pawar-Ramdas Athawale Sarkarnama
मुंबई

आठवलेंची डबल ढोलकी : ‘बारामतीत पवारांचा पराभव नको; पण भाजपचा विजय हवा’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए NDA) असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाबाबत डबल ढोलकी पद्धतीचे भाष्य केले आहे. बारामतीची जागा ही ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची आहे; पण आमचा निर्धार आहे तिथे जिंकून यायचे. बारामतीत शरद पवार यांची हार नको; पण आमचा (भाजपप्रणित BJP एनडीएचा) विजय झाला पाहिजे, असे विधान आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. (Do not want Pawar's defeat in Baramati; But BJP wants victory : Ramdas Athawale)

केंद्रीय मंत्री आठवले यांनी माध्यमांशी बोलताना बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीमध्ये भाजपचा खासदार निवडून आण्यासाठी गेल्या आहेत. आम्ही बारामतीची सीट जिंकून आणू शकतो. बारामतीची जागा ही शरद पवार यांची आहे; पण तिथे जिंकून यायच, असा आमचा निर्धार आहे. कारण, महाराष्ट्रामध्ये ४५ सीट जिंकण्याचे आमचे स्वप्न आहे. बारामतीत शरद पवार यांची हार नको; पण आमचा विजय झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क मैदानाच्या वादावर बोलताना आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवाजी पार्क मैदान मियालयला हवे होते. उद्धव ठाकरे यांना दुसरे मैदान दिले पाहिजे होते. पण उच्च न्यायालयाने यावर आता निर्णय दिलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही मेळावे झाले पाहिजेत. मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मानतो; आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मनात होतो, असा चिमटाही आठवले यांनी यावेळी बोलताना काढला.

राज ठाकरे यांना पॉलिटिकल फायदा होत नाही. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये त्यांनी वाद लावू नये. आधी त्यांच्याकडे बरेच रंग होते (झेंड्याचे). आता ते एका रंगाकडे वळले आहेत. आम्हाला मात्र निळा आणि भगवा आवडतो. पाकिस्तान झिंदाबाद घोषणेला कोणीही पाठिंबा देणार नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करणे, ही भूमिका घेतली असेल तर आमचा पाठिंबा आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

आठवले म्हणाले की, भारतात आणलेले चित्ते मी बघितले नाहीत. पण, नॅशनल पार्कमधल्या चित्याला आम्ही अडप्ट adopt केले आहे. मी आणलेले चित्ते पाहायला जाणार आहे आणि मिळाले तर मी तिथून एक चित्ता घरी आणार आहे.

रिपब्लिकन पक्षाकडे अजूनही चिन्ह नाही. पण, आम्ही निवडणूक आयोगाला तराजू मशाल हे चिन्ह मागितले आहे, असे सांगून आठवले म्हणाले की, राहुल गांधी यांची भारत जोडो नव्हे तर भारत तोडो यात्रा आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत केला पाहिजे. कारण, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करायचा आहे. मोदींचा सामना म्हणजे बच्चो का खेल नहीं हैं, असेही त्यांनी राहुल गांधी यांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT