Anil Parab-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Parab Attack On Shinde : मोदींच्या बहिणीला शिंदे तिकिट देऊ शकले नाहीत; विधानसभेला किती माना कापणार?

Vijaykumar Dudhale

Mumbai, 25 May : जे जे लोक शिवसेनेतून बंडखोरी करून गेले, त्यांना उमेदवारीचा एकनाथ शिंदे यांनी विश्वास दिला होता. पण, पहिल्याच टप्प्यात १३ खासदारांना ते तिकीट देऊ शकले नाहीत. पंतप्रधानांच्या बहिणीला (भावना गवळी) तिकीट देऊ शकले नाहीत. त्यामुळे विधानसभेला किती लोकांची मान कापली जाईल? असा सवाल मुंबई पदवीधर विधान परिषदेचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी केला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून (Mumbai Graduate Constituency) शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अनिल परब (Anil Parab) यांना, तर शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना परब यांनी हे विधान केले आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विचार पटू शकतात. हळूहळू अनेकांचे विचार असे होऊ शकतात. त्यांच्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल परब म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. या मतदारसंघावर शिवसेनेची पकड घट्ट आहे. शिवसैनिकांची नोंदणीही चांगली झालेली आहे, त्यामुळे मला नक्की यश मिळेल. नेते सोडून गेले तरी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसेनेचे गट झाले असतील तरी सामान्य शिवसैनिक आमच्यासोबत आहेत.

महायुतीमध्ये शिंदे गट चेपत आहे. या मतदारसंघाबाबत भाजपने दावा केला तर शिंदे गटाची गळचेपी होईल. मी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे, त्यामुळे समोर कोण आहे, याचा विचार आम्ही करत नाही. मात्र, ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले, त्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलणार की नाही, हे शिंदे गटाने ठरवावे, असेही परब यांनी आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांवर आशिष शेलार यांचा विश्वास नाही. मुख्यमंत्री महापालिकेवर विश्वास दाखवत आहेत आणि आशिष शेलार तो दाखवत नाहीत. महायुतीमध्ये समन्वय नाही. नाहीतर त्यांना कॉन्ट्रॅक्टर बोलवायचे असतील. बाकी गोष्टींसाठी सरकार प्रशासनावर प्रेशर टाकत आहे. मग आता तर त्यांच्या ताब्यात आहे. मग नालेसफाई का झाली नाही. आशिष शेलार आणि मुख्यमंत्री यांच्यात सोयीचे राजकारण सुरू आहे, असेही परब यांनी नमूद केले.

अनिल परब म्हणाले, मुंबई महापालिका कशी काम करते, हे आम्हाला माहीत आहे. किती टप्प्यावर काय काम सुरू आहे. शेवटचा टप्पा जोवर पाहत नाही, तोवर सांगता येत नाही. आता पहिला तर नालेसफाई बाबत आम्ही समाधानी नाही.

ईडीची कारवाई सुरू असलेले अनेक नेते भाजपमध्ये गेले. त्यांना क्लीनचिट देण्याचे काम सुरू आहे. रवींद्र वायकर, यशवंत जाधव यांच्यावर आरोप करून त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यांचे चरित्र लगेच स्वच्छ झाले का? अटक करा, जेलमध्ये टाका असे मागणारे आज त्यांनाच उमेदवारी देत आहेत. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीला अतिशय चांगले यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT