CM Eknath Shinde News  Sarkarnama
मुंबई

CM Eknath Shinde News : भर स्टेजवर शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिला मराठा आरक्षणाचा शब्द; पण जरांगे पाटील म्हणाले...

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरच्या दसऱ्यातून जबरदस्त डाव टाकून, मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंना ताकद दिली. मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने ठाकरेंना मोठा फायदा होण्याची चिन्हे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी; तर भरसभेत भाषण अर्धवट सोडून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेकडे जाऊन शपथ घेतली आणि मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचे कबूल केले.

शिवाजी महाराजांच्या साक्षीने आरक्षणाचा शब्द देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) ठाकरेंवर मात केल्याचे स्पष्ट आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आहे. अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा ठाकरे आणि शिंदेंनी लावून धरला.

मराठा आरक्षण, सराटीतील पोलिसांचा लाठीमार, त्यानंतरची टोलवाटोलवीचे मुद्दे हातात घेऊन ठाकरेंनी मराठा आरक्षणालाच्या मागणीला बळ दिले. त्यापलीकडे जाऊन ठाकरेंनी जरांगेचे कौतुक केले. त्यानंतर आझाद मैदानातील सभेतून बोलणाऱ्या शिंदेंनी मराठा आरक्षण देणार असल्याचे सांगून टाकले.

" कोणाच्याही वाट्याचे काढून न घेता, मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देऊ. ते टिकणारे असेन, असे शिंदेंनी सांगितले. त्यानंतर व्यासपीठावर ठेवलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झाले, छत्रपती शिवाजी महाराजांची शथप घेतली आणि मराठा समाजाला टिकणारे आरक्षणार देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. या मागणीवर ठाम राहिलेले जरांगे पाटील रोज शिंदे-फडणवीस-पवार सरकारला इशारे देत आहेत. दुसरीकडे, विरोधक मात्र मराठ्यांना ताकद देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातही मराठ्यांच्या आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी चर्चेत आहे.

जरांगे पाटील काय म्हणाले...?

शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंची बाजू घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून, मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतरही जरांगे आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम राहिले.

याआधी आम्ही वेळ दिला आहे. मात्र, काही घडले नाही. आम्ही हक्कासाठी लढत राहून, असे सांगून मागणीपासून तसूभरही मागे हटणार नसल्याचेच जरांगेंनी जाहीर केले. ठाकरे यांच्या भाषणानंतर आणि शिंदेंच्या सभेदरम्यान जरांगेंनी एका वृत्तवाहिनी मुलाखत दिली. तेव्हा आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगेंच्या बोलण्यातून स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यातील उपोषण स्थागित केल्यानंतर आणि ४० दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे आता नव्याने ॲक्शन मोडवर आले आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत शांत राहून २५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करण्याचा जरांगेंचा इरादा आहे. मराठ्यांच्या आंदोलनांची व्यापकता जाणून आरक्षणाला पाठिंबा देण्याची स्पर्धा राजकीय पक्षांत लागली आहे. मात्र, त्याकडे पूणर्पणे कानाडोळा करत जरांगे हे उपोषण सुरू करणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT