Thackeray Criticized on Fadanvis :  Sarkarnama
मुंबई

Thackeray Criticized on Fadanvis : ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने फडणवीस अस्वस्थ : ठाकरेंनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : फडणवीस, सांभाळा !, या शीर्षकाखाली सामनाच्या अग्रलेखातून शनिवारी पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखातून देवेंद्र फडवणीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली अन् देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्विकारावे लागलं. त्यांना राजकीय कारकिर्दीत एक पायरी खाली यावे लागल्याने ते काहीसे अस्वस्थ झाले असून त्यांची संवेदनशीलता संपल्याने अहंकाराचे ते महामेरू बनल्याच्या टीकेचे बाण सामन्याच्या अग्रलेखातून सोडण्यात आले आहेत.

सामन्याच्या अग्रलेखात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले.त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस, सांभाळा!

झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेऊन पडलेल्यांना जागे कसे करायचे, हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री, ते सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. ”मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,” असे श्री. फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था असल्याची टीका अगलेखातून केली आहे.

गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून ‘पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले. आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत. मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो. या त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही. आता 2019 साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. फडणवीस व त्यांचा पक्ष अर्धग्लानीत असला तरी महाराष्ट्राची जनता झोपेत नसल्याचे म्हटले आहे.

बेइमानी केली ती भाजपच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला व श्री. फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेइमानी तेव्हा झाली नसती तर महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता हे सत्य ‘प्यारे’ फडणवीस नाकारू शकत नाहीत. फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला ‘बिनपगारी उपअधिकारी’ करून टाकले. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रांत चिंतेची स्थिती निर्माण झाली, अशा शब्दांत सामन्याच्या अग्रलेखातून टीका केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT