Dombivali Crime News
Dombivali Crime News Sarkarnama
मुंबई

शेतकरी कुटूंबाला मारहाण करणाऱ्या 'त्या' नेत्यावर पाच दिवसांनी गुन्हा दाखल..

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : जमिनी विक्रीच्या वादातून दहिसर मोकाशीपाडा येथे राहणारे एकनाथ मोकाशी व त्यांच्या मुलांना डोंबिवलीतील (Dombiwali) एका माजी नगरसेवकाने जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.3 फेब्रुवारी) रात्री घडली होती. पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याने पोलिस पिडीत शेतकरी कुटूंबाची तक्रार दाखल करुन घेत नसल्याने कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी शीळ डायघर पोलिस (Thane Police) ठाण्यात ठिय्या मांडत शेतकऱ्यांची तक्रार दाखल करुन घ्या म्हणून पोलिसांना विनंती करत होते. अखेर पाच दिवसांनी शीळ डायघर पोलिसांनी राजकीय नेते, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, (Ramesh Mhatre) सचिन पाटील, (Sachin Patil) वैभव पाटील (Vaibhav Patil) यांसह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

कल्याण ग्रामीण भागातील मोकाशीपाडा, दहीसर मोरी व दहिसर अशी तीन गावांची मिळून पिंपरीगाव येथे 284 एकर जमिन आहे. या जमिनीचा सात बारा पंच कमिटीच्या नावे असून या कमिटीमध्ये एकनाथ मोकाशी यांचा समावेश आहे. या जमिनीच्या विक्रीसाठी डोंबिवलीचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे हे ते सांगतील त्या व्यक्तीला विका यासाठी दबाव आणत होते. त्यावर कमिटीचे एकमत नसून 3 फेब्रुवारीला रात्री म्हात्रे हे काही व्यक्तींसह घरी आले. त्यावेळी त्यांनी जमिनीसाठी गिऱ्हाईक आणले असून त्यांना ही जमिन विकून टाका असे सांगितले. यावर कमिटीची मिटींग घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगताच रमेश यांनी शिविगाळ करत एकनाथ मोकाशीसह मुले देविदास व प्रशांत यांनाही जबर मारहाण केल्याचे मोकाशी यांनी सांगितले.

याप्रकरणी रमेश यांच्याविरोधात शीळ डायघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी ते त्याच रात्री पोलिस ठाण्यात गेले. त्यांना मेडीकल करण्यास सांगितल्यानंतर मात्र, पोलिस याप्रकरणी गुन्हा नोंद करीत नव्हते. दुसऱ्या दिवशीही एकनाथ यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यास पोलिसांना सांगितले, मात्र पोलिस त्यांचे म्हणने एकूण घेत नसल्याने कल्याण ग्रामीणचे आमदार पाटील यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत शेतकरी कुटूंबाची तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांना विनंती केली. मात्र, पाच ते सहा तास ठिय्या मांडूनही पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात होते. शेतकरी कुटूंबाला न्याय मिळावा व त्यांची तक्रार दाखल करुन घेतली जावी यासाठी आमदार पाटील हे सातत्याने प्रयत्न करीत होते.

अखेर पाच दिवसांनी शीळ डायघर पोलिसांनी एकनाथ मोकाशी यांची तक्रार नोंदवून घेत रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांसह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना न्याय देत गुन्हा दाखल केल्यानंतर आमदार पाटील यांनी एकनाथ मोकाशी यांच्यासह पोलिस ठाणे गाठून पोलिसांचे आभार मानले. तसेच, या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी देखील केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT