Mumbai News : महायुती सत्तेत आल्यापासून ठाण्यातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भाजपकडून मंत्री गणेश नाईक यांना ताकद दिली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. नाईक आणि शिंदे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे.महायुतीत असले तरी या दोन्हीही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची आणि आव्हान देण्याची एकही संधी सोडत नाही. आता पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंना ललकारलं आहे.
गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खोचक टोला लगावला आहे.ते म्हणाले, प्रत्येकाला लॉटरी लागत नाही. परंतु, शिंदे यांना लॉटरी लागली. ते मुख्यमंत्री झाले,त्याचा आनंद आहे.पण कमावलेले टिकवता आले पाहिजे. किती कमावलं,कसं कमवलं, पण कसं टिकवलं हेच जनसामान्यांच्या ध्यानात राहतं असा चिमटा नाईकांनी शिंदेंना काढला आहे.
राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. नाईकांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमाला शिवसेनेचे दोन्ही आमदार तसेच खासदार डॉ.हेमंत सावरा उपस्थित होते.
महायुतीत मंत्रिपद आणि पालघरच्या पालकमंत्री जबाबदारी स्विकारल्यानंतर गणेश नाईक यांनी लगेचच आपण ठाण्यातही जनता दरबार घेणार असल्याची घोषणा करत शिंदेंना आव्हान दिलं होतं. नवी मुंबईत नाईकांची मोठी ताकद असून शिंदे यांच्याकडून तिथे शिवसेनेला बळ देत पक्षवाढीसाठी मोठी पावलं उचलली जात आहे. हीच बाब नाईकांना खटकल्याची चर्चा आहे.
गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भाषणामुळे महायुतीत ठिणगी पडली होती. त्यावेळी नाईकांनी ठाण्यात सर्वात जास्त सिनीयर मंत्री मी आहे असं उघडपणे म्हणत एकनाथ शिंदेंनाच डिवचलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेकडूनही तिखट पलटवार करण्यात आला होता.
यावेळी गणेश नाईक यांनी ठाण्यात सर्वात जास्त सिनिअर मंत्री मी आहे. मी कधी कुणाची जात विचारत नाही. माझी जात कुणी विचारलं तर मी अभिमानाने सांगतो, असेही गणेश नाईक म्हणाले. मी 1990 ला आमदार झालो. ठाण्यात सर्वात जास्त सिनिअर म्हणजे 4 वेळा झालेला मंत्री मी एकटाच आहे. समाजाने ते घडवले. स्पर्धा ही सकारात्मक आणि गुणात्मक असली पाहिजे. द्वेषाची स्पर्धा असता कामा नये, असेही नाईक यांनी म्हटलं आहे.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ठाण्यात काही प्रॉब्लेम नाही, नवी मुंबईत लक्ष द्या,’ अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत निवडणुकीआधीच नगरसेवकांचा आकडा 53च्या पुढे गेला आहे. येत्या दिवसांत हा आकडा आणखी पुढे जाणार असल्याने महापालिका निवडणुकीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करत नाईकांना आव्हान दिलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.