Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
मुंबई

Girish Mahajan Vs Eknath Khadse : 'स्मिता वाघांना पाडण्यासाठी खडसेंनी फोन फिरवले, त्यांची ऑडिओ क्लिप..'; महाजनांचा गौप्यस्फोट

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झालेल्या खडसेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांवर टीकेची झोड उठवत आपण राष्ट्रवादीतच असल्याचे स्पष्ट केले आहे. आता महाजनांनी 'स्मिता वाघांना पाडण्यासाठी खडसेंनी फोन फिरवले. तसेच त्यांची यासंबंधीचे ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा मोठा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. याचवेळी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांचे कट्टर विरोधक राहिलेल्या एकनाथ खडसेंवरही गंभीर आरोप केले. महाजन म्हणाले, एकनाथ खडसे नेहमी असं सांगतात की, जळगाव आणि रावेर या दोन्हीही जागा लोकसभेला माझ्यामुळेच निवडून आल्याचा दावा करत आहे. पण यात काही तथ्य नाही.

मंत्री महाजन म्हणाले, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा पक्षप्रवेश झालेला नव्हता.ते स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषेदेचे आमदार होते. त्यांनी माझ्यासह देवेंद्र फडणवीसांवर वाट्टेल ते आरोप केले होते. त्यामुळे खडसेंना आम्ही प्रचारात सहभागी होऊ दिलं नाही. तसं आम्ही पक्षातल्या वरिष्ठ नेतेमंडळींना सांगितलंही होतं. नाहीतर या दोन्हीही मतदारसंघातील जनतेनं आम्हांला मतदारसंघात फिरू दिलं नसतं. जर खडसे प्रचारात दिसले असते तर उलट आम्हालाच फटका बसला असता असं महाजन यांनी सांगितलं.

उलट एकनाथ खडसेंनी सुनेला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतानाच जळगावच्या आमच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांना पाडण्यासाठी मतदारसंघात फोन फिरवले. यासंबंधीच्या ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

जळगाव आणि रावेर या दोन्हीही जागा कुणा एकामुळे निवडून आलेल्या नाहीत. मुळात जळगाव जिल्ह्यात आमची भाजप पक्षसंघटना खूपच मजबूत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या दोन्हीही मतदारसंघात दिवस-रात्र काम केले. यावेळी रक्षा खडसे यांना आमचा कुठलाही विरोध नव्हता. त्यांनी ग्राऊंड लेव्हलला चांगलं काम केलं होतं. त्यांचा जनसंपर्कही चांगला ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हांला काहीही आक्षेप नव्हता. तसं जर असतं तर आम्ही त्यांच्या उमेदवारीविषयी ठरवलं असतं तर वरती बोलू शकलो असतो. पण तसं काही करण्याचा प्रश्नच नव्हता असंही महाजन यांनी सांगितले.

भाजपने तिकीट जाहीर करण्यापूर्वी रक्षा खडसे यांच्या तिकीटासाठी एकनाथ खडसे यांनी सर्वच पक्षांचे उंबरठे झिजवले होते असंही खळबळजनक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. ते म्हणाले, सगळी पदं त्यांना त्यांच्यात घरात पाहिजे. सगळ्यात पक्षात माझ्या घरातील लोक पाहिजे, असे त्यांना वाटते. त्यांनी कितीही बडबड केली तरी माझ्या मतदारसंघातील लोकं त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, असे देखील गिरीश महाजन म्हणाले.

फक्त पदं भोगायची, बडबड करायची, एवढीच कामं ते करतायेत. आता ते उघडे पडतायेत. त्यांचे जरा मानसिक संतुलन बिघडले आहे. मी कामावर मोठा आहे. मला एवढं बोलता येईल की, त्यांना पळता मुश्किल होईल, पण माझी ती संस्कृती नाही.त्यांनी मी केलं,माझ्यामुळे झालं असा अहंपणाचा भाव बाजूला ठेवायला हवा. तेच त्यांच्या आजच्या अवस्थेचे कारण आहे, असंही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

खडसे काय म्हणाले होते...?

भाजप प्रवेशासाठी वेटिंगवर असलेल्या एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार याची चर्चा सुरू आहे. गणपती विसर्जनानंतर वरिष्ठांशी चर्चा करून खडसेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, गणेशविसर्जन होऊन पाच दिवस झाले तरी खडसेंच्या भाजप प्रवेशावर कोणताही निर्णय झालेला नाही.

गणेशविसर्जनानंतर देखील पक्षप्रवेश झाला नसल्याने एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले, गणेशविसर्जनासोबत भाजपमधील प्रवेशाचे देखील विसर्जन झाले आहे. त्यामुळे आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT