Mumbai News: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मिरा भाईंदरच्या मनसेच्या सभेतून पुन्हा एकदा हिंदी सक्तीच्या विरोधात महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. या राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसैनिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. याचसभेतून कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच असा इशाराही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी दिला.आता त्यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना टार्गेट करत मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुंबई पोलिसांकडे मोठी मागणी केली आहे.
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शनिवारी(ता.19)माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज ठाकरे यांचे लाड बंद करावेत, देशाला, राज्याला महाराष्ट्राच्या अर्थकरणाला हे हानिकारक आहे. भाजप किंवा कोणताही राजकीय पक्ष असो मला तुम्हा सगळ्यांना आवाहन करायचं आहे की,ठाकरेंच्या भाषेचा तुम्ही सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे.
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी यावेळी मिरा भाईंदरमधील सभेचा उल्लेख करत राज ठाकरेंच्या आजूबाजूला लागलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज बघितले,तर त्यांची भाषा ही असंसदीय असल्याची टीका केली.तसेच देशाची अखंडता आणि एकात्मतेला तडा देणारी भाषा आहे. राज्या-राज्यांमध्ये भेद निर्माण करणारे हे वक्तव्य असून सामान्य कष्टकरी रिक्षावाल्याला या वक्तव्याचा त्रास होत असल्याचा आरोपही केला.
सदावर्ते म्हणाले,राज ठाकरे हे देश हिताच्या विरोधात बोलत आहेत,मुंबई पोलिसांनी कोणताही विलंब न करता राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे,आणि त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती की, राज ठाकरे नावाच्या व्यक्तीचा लाड बंद करा. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असा घणाघातही केला.
यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांनी गुन्हा नोंदवतानाच कायद्याप्रमाणे राज ठाकरेंना अटक करायला हवी,अशी मागणीही केली.तसेच त्यांच्या बाबत जेवढं बोलावं,जेवढी त्यांची निंदा करावी, निषेध करावा, तेवढा थोडाच आहे. पोलीस आयुक्त जर राज ठाकरे यांना नोटीस देणार असतील तर ती लवकरात लवकर द्यावी, लोकांचा कायद्यावरील विश्वास वाढेल, असंही ज्येष्ठ वकील सदावर्ते यांनी यावेळी म्हटलं.
गुणरत्न सदावर्ते यांनी 5 जुलैला झालेल्या विजयी मेळाव्यावर टीका करताना विजयोत्सवाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या करणार आहेत का? याचे उत्तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना द्यावं लागणार असल्याचं ठणकावलं होतं.
तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नतद्रष्ट असून ते मराठी शाळा बंद पडतील. यावेळी त्यांनी कोणी माझी हत्या केल्यास त्यासाठी पूर्णपणे राज ठाकरे आणि यांचे कार्यकर्ते, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जबाबदार धरावं असंही सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.