Udhav Thackeray, Raj Thackeray
Udhav Thackeray, Raj Thackeray sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता... राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Umesh Bambare-Patil

मुंबई : २०१९ ला निवडणुका झाल्यानंतर शिवसेना-भाजपानं फारकत घेतली. का तर म्हणे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. ज्यांचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री असे पहिल्यांदा ठरल होतं. तर मग २०१९ ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता, असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला.

राज्यात सुरू असलेल्या राजकिय घडामोडीत पडद्यामागील घडामोडी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडल. ते मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांच्या सभेत बोलत होते. सेना, भाजपामध्ये २०१९ मध्ये झालेल्या फारकतीवर राज ठाकरेंनी टिकास्त्र सोडले.

ते म्हणाले, २०१९ ला निवडणूका झाल्यानंतर शिवसेना-भाजपानं फारकत घेतली. का तर म्हणे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. मला अजूनही आठवतंय. कारण बाळासाहेब असताना झालेल्या त्या बैठकांत मी ही उपस्थित होतो. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे बरेच जण होते.

तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे, तर २०१९ ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता. हे म्हणतात मी शब्द घेतला होता. चार भिंतींमध्ये शब्द घेतला होता, तिथे दोनच माणसं. एक तर हे खरं बोलतायत किंवा ते खरं बोलतायत. मुळात तुम्ही मागणी करताच कशी. जास्त आमदार असणाऱ्याचा मुख्यमंत्री हे ठरलं असताना तुम्ही मागणी करताच कशी.

मोदी व्यासपीठावर भाषण करताना तिथे उद्धव ठाकरे बसलेले होते. मोदी त्यांच्या भाषणात सांगत होते की, आपली पुन्हा सत्ता येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. अमित शाह यांनीही भाषणात फडणवीस मुख्यमंत्री होतील असे सांगितले. त्याच वेळी आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

त्यावेळी त्यांना फोन का नाही केला, सगळे निकाल लागल्यानंतर मग तुम्हाला आठवलं. कारण या सगळ्या गोष्टींची बोलणी आधीपासून सुरू असणार, असा दावा राज ठाकरेंनी केला. २०१९ ला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचं सरकार अस्तित्वात आलं. लोकांनी मतदान कुणाला केलं होतं. शिवसेना-भाजपाला मतदान करणारे लोक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणारी लोक, या दोघांना काय वाटलं असेल.

ही हिंमत त्याच वेळी होते, जेव्हा लोक त्यांना शिक्षा करत नाहीत. जनता यांना शिक्षा करत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.''राजकारण इतका गंभीर विषय आहे. आत्ताच्या सरकारच्या भाषेत आपण त्याला खेळाचा दर्जा दिला आहे. दहीहंडीला देतोच आहोत. मंगळागौरलाही खेळाचा दर्जा द्यायचाय म्हणे. खरंतर लग्न झाल्या झाल्या त्याला हार घालून खेळाचा दर्जा दिला पाहिजे'', असा टोलाही देखील राज ठाकरेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT