Ashish Shelar sharad pawar Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : पंतप्रधान मोदींच्या सभांची शरद पवारांसह आघाडीमधील नेत्यांना वाटतेय भीती; भाजप नेत्याचं मोठं विधान

Pradeep Pendhare

Ashish Shelar News : लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घ्याव्यात म्हणजे, भाजपचा पराभव होईल, असे शरद पवार आणि विरोधक वारंवार म्हणतात. या विधानाचा भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील कोअर कमिटीच्या बैठकीत मूळ अर्थ सांगत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

शरद पवार यांच्यासह आघाडीच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची भीती आहे. यातूनच पंतप्रधान मोदींच्या सभांविषयी विरोधकांकडून, अशी वारंवार विधानं होत आहेत, असे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकांसमोर जाताना राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती, असा संघर्ष पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगण्याची शक्यता आहे. भाजप (BJP) कोअर कमिटीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकांचा सपाटा लावला आहे. भाजप कोअर कमिटीची ही दुसरी बैठक आहे. मुंबईमधील भाजपच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. जनतेपर्यंत पोचण्यासाठी भाजपची काय रणनीती असावी, यावर चर्चा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा मुद्दा चर्चेत आला. यावर आमदार आशिष शेलार यांनी विरोधक नरेंद्र मोदी यांच्या सभेवरून करत असलेल्या टीकेचा समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे खोचकपणे शरद पवार वारंवार म्हणतात. यावर आमदार आशिष शेलार यांनी कोअर कमिटीच्या बैठकीतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्यासह आघाडीच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची भीती वाटते. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार अशी विधाने होत आहेत. परंतु महायुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

भाजपमध्ये संघटनात्मक बदल नाही

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा होती. कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे संघटनात्मक बदल होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. तो जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजपकडून व्यापक अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. येत्या 10 जुलैपर्यंत याबाबत भरगच्च कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT