Prithviraj Chavan
Prithviraj Chavan Sarkarnama
मुंबई

पृथ्वीराजबाबांचे नेतृत्वाला इशाऱ्यांवर इशारे...'ती काँग्रेसची ऐतिहासिक चूक ठरेल, जनता माफ करणार नाही'!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आपण एक पर्याय उभा करू शकलो नाही, तर काँग्रेस पक्षाची (congress) ऐतिहासिक चूक ठरेल. देशातील जनता आपल्याला माफ करणार नाही. देशात हुकूमशाही येण्याला काँग्रेसही तेवढीच जबाबदार असेल, कारण एक प्रभावी पर्याय देऊ शकलो नाही म्हणून. आगामी काळात काही निवडणुका आहेत, अशाच पद्धतीने पक्ष चालला तर निवडणुकांमध्ये फार आशादायक चित्र असेल, असे मला वाटत नाही, असे इशारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिले. (It will be historic mistake of Congress if fails to provide alternative to Modi : Prithviraj Chavan)

ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेतृत्वाला आगामी वाटचालीबाबत सूचित केले आहे. ते म्हणाले की, गुलाब नबी आझाद यांनी बहुतांश राज्यात निवडणूक प्रभारी म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत. पक्षातील सर्वांत ज्येष्ठ सेक्यूलर चेहरा असलेल्या आझाद यांना हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. देशाला आज मजबूत काँग्रेस पक्षाची गरज आहे. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या माध्यमातून एक हुकूमशाही त्या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे. देशात अघोषित आणीबाणीची परिस्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही काही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ताकदवान काँग्रेस पक्षच मोदींना पर्याय ठरू शकतो.

एका दृष्टीने गुलाब नबी आझाद यांनी जाहीर पत्र लिहिले आणि प्रकट केले, हे बरं झालं. कारण, मागच्या वेळी आम्ही जी २३ गटाने जे काही गोपनीय पत्र लिहिले होते. गोपनीय असूनही ते पत्र बाहेर फोडण्यात आले होते. खरं तर पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या समोर पत्र ठेवून चर्चा व्हायला पाहिजे होती. पण त्यावेळी ती झाली नाही. काटछाट करून वर्तमानपत्रात ज्या काही बातम्या आल्या होत्या, त्यावरच बैठकीत चर्चा झाली. प्रामाणिकपणे पक्षाला बळकट करावं, असा जो आमचा उद्देश हेाता. पण त्याऐवजी आमच्या सार्वजनिकरित्या टीका करण्यात आली होती. हे बंडखोर आहेत, असं सांगण्यात आलं. महाराष्ट्रातही काही लोकांना आमच्यावर टीका करायला सांगितलं गेलं, असा आरोप पृथ्वीराजबाबांनी केला.

आझाद यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या पक्षाच्या परिप्रेक्षामध्ये काहीतरी निर्णय घेतील. काँग्रेस पक्षात सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातून काही तरी योग्य मार्ग काढला पाहिजे. जैसे थे परिस्थिती ठेवली तर काँग्रेसचे भवितव्य फार आशादायक असणार नाही, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT