Jayant Patil News Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : महाराष्ट्र बघतोय, राजकीय संस्कृतीचे धिंडवडे.. यूपी-बिहारपेक्षा वाईट; पाटलांनी डागली तोफ!

Vishal Patil

Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार असून विरोधी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अनेकदा प्रश्न विचारले जात असतात. हिवाळी अधिवेशनानंतर आपआपल्या मतदार संघात आलेल्या लोकप्रतिनिधीकडून माध्यमांशी संवाद साधत तसेच सोशल मिडियावर व्यक्त होत सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात भाजप आमदाराने पोलिस कर्मचाऱ्यांच्या कानाखाली लगावल्याने फेसबुक पोस्टमधून सरकारवर हल्लाबोल केला आहे. सत्ताधारी महायुती महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघाले असल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील ससून रुग्णालयात राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित कार्यक्रमातील कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचं नाव नसल्याने ते नाराज होते. कार्यक्रम झाल्यावर सुनील कांबळे हे व्यासपीठावर खालून येत होते. त्यावेळी सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याची घटना घडली. त्यावेळी नेमकं काय घडले हे कोणास समजलं नाही. त्यानंतर सुनील कांबळे यांनी बाहेर येऊन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केली. तसेच हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी देखील सुनील कांबळे यांचा तेथील एका अन्य कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्याची घटना घडली होती. या सर्व प्रकारावरून शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 

जयंत पाटील हे सध्या इस्लामपूर- वाळवा या आपल्या मतदार संघात असून लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. वाळवा तालुक्यातील साखराळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाची "एक तास राष्ट्रवादीसाठी" या उपक्रमाची 25 वी बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मागील अनेक बैठकांमध्ये सत्ताधारी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे देशातील परिस्थिती बदलावर चर्चा झाली. जुन्या गोष्टींना नव्याने उजाळा देऊन सध्याच्या परिस्थितीवर पांघरूण घालून देशातील वैचारिक परिस्थिती बदलण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत.

जयंत पाटील यांची फेसबुक पोस्ट -

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघाले.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख आणि अनेक मोठ्या नेतृत्वाचा आदर्श या महाराष्ट्राला आहे. या नेत्यांनी कधी आपली पातळी खाली जाऊ दिली नाही. मात्र आज सत्तेत सामील असलेले मंत्री, आमदार, खासदार कधी सामान्य माणसांवर लाठीचार्ज करायला सांगतात, कधी पोलीस बांधवांच्या कानशीलात लगावतात तर कधी एकमेकांचा पाणउतरा करतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पार धिंडवडे काढले जात आहेत. हे महाराष्ट्र बघतोय ! जाहीर निषेध.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT