Jayant Patil and Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Sharad Pawar : जयंत पाटलांनंतर जितेंद्र आव्हाड घेणार अजित पवार अन् त्यांच्या टीमशी पंगा ?

Deepak Kulkarni

NCP Political News : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना अजित पवारांनी प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावं अशी मागणी करतानाच थेट शरद पवारांसमोरच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे महिने आणि दिवसही मोजून दाखवले होते. यानंतर राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली होती. आता जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले आहे. यामुळे आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर यावर्षी पहिल्यांदाच मुंबई आणि अहमदनगर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिनाचे कार्यक्रम पार पडले. आता पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने धडाकेबाज कामगिरी करत 10 पैकी तब्बल 8 जागा जिंकल्या.त्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या शरद पवार गटाने आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीवर फोकस केला आहे.नगरमधील मेळावा म्हणजे याची नांदी होती. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्यानंतर दुसरीकडे जयंत पाटलांनंतर (Jayant Patil) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जाताहेत.

जयंत पाटलांनी 2018 ला प्रदेशाध्यक्षपद स्विकारले होते. ही मुदत तीन वर्षांची असताना त्यांना दोनदा वाढ देण्यात आली.या प्रदेशाध्यक्षपदावरुन राष्ट्रवादीत मोठा वादंगही निर्माण झाला होता.पण आता खुद्द जयंत पाटलांनीच राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपण फक्त चार महिने प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केले.प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची कोणतीही चर्चा नसताना अचानक पाटील यांनी टाकलेल्या या बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांनाच धक्का बसला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले, आतापर्यंत अनेकांनी माझे दिवस मोजले आहेत.आता फक्त चार महिने काही बोलू नका.थोडी कळ काढा.माझ्यावर टीका करायची असेल तर थेट पवारसाहेबांकडे जाऊन तक्रार करा.ते माझ्या दोन कानाखाली मारतील किंवा काही करतील.मात्र, ट्विटरचा वापर करू नका. पक्ष हा राज्यातील लोकांचा आहे. कुणा एकाचा आहे. नोव्हेंबरनंतर मीच नमस्कार करेन, असे म्हणत पाटलांनी विधानसभा निवडणुकीनंतर पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.

आव्हाडांचंही नाव चर्चेत...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्यातरी फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड,राजेश टोपे, अनिल देशमुख या नावांची चर्चा आहे.त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या बंडानंतर त्यांनी सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाची बाजू मांडताना विरोधी गटावरही तुफानी हल्ला चढविताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासाठीच्या न्यायालयीन लढाईत त्यांनी शरद पवार गटाकडून जोरदार पाठपुरावा केला होता.संकटकाळात शरद पवारांसाठी किल्ला लढवलेल्या आव्हाडांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होऊ शकते.

तसं झालं तर जितेंद्र आव्हाडांसमोर महायुतीसह अजित पवार गटाशी पंगा घ्यावा लागणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय परिस्थिती नेमकी कशी असेल याविषयी आत्ताच अंदाज बांधणे कठीण आहे.पण जयंत पाटलांच्या नेतृत्वात पक्षाची गाठलेली उंची कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. जयंत पाटलांची संयमी नेतृत्वानंतर आव्हाडांच्या रुपाने एक आक्रमक चेहरा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT