Jitendra Awhad- Sunil Tatkare  Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : तटकरे तुम्ही इतके आतल्या गाठीचे कसे ! आव्हाडांनी दिले सुनील तटकरेंना उत्तर !

Chaitanya Machale

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच भाजप बरोबर जाण्याची भूमिका होती. त्यांनीच पुढे ती बदलली असल्याची अप्रत्यक्ष कबुली शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भाषणात दिल्याचे अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. 'सगळे ठरविले तुम्ही, केले तुम्ही, मी केवळ सत्य सांगितले', असे म्हणत 'तटकरे तुम्ही इतके आतल्या गाठीचे कसे !' असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये जे आम्ही वारंवार म्हणत होतो की, भाजपबरोबर जाण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांनी घेतला होता, ते सिद्ध झाले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच त्याची कबुली दिली असून चारवेळा अजितदादांना शरद पवारसाहेबांनी फसविले, असे म्हणत याची कबुली दिल्याचा आरोप तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला होता. तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आव्हाड यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले साहेबांनी तुम्हाला तारखा दिल्या कारण तुम्ही मागे लागला होता. चला बीजेपीमध्ये जाऊ म्हणून. 2009 मध्ये तुम्ही फॉर्म्युला दिला होता. 2014 च्या निवडणुकीत देखील तुम्हीच बीजेपीमध्ये जाण्याासाठी मागे लागला होता.

पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मी केवळ सत्य सांगितले. भाजपमध्ये (BJP) जाण्यासाठी तुम्हीच मागे लागला होता. सगळे ठरविले तुम्ही, सगळे केले तुम्ही. मी सत्य सांगितले, असे म्हणत तटकरे तुम्ही इतके आतल्या गाठीचे कसे !असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तुम्ही विचारधारा सोडली त्यामुळे तुम्ही भाजपवर ओझे झाले आहात, असे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ म्हणाला आहे. मात्र तुम्ही यावर बोलू शकत नाही. जरा त्यावर बोलण्याची हिंमत दाखवा, अशा शब्दात आव्हाडांनी तटकरे यांना सुनावले आहे.

तुम्ही ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना सांगता की तुम्ही राज्यभर फिरा. म्हणजे राज्यसभा विसरा. तुमच्या मुलाबाळांत किती संघर्ष चालू आहेत, हे सर्व आम्हाला माहित आहे. तुम्ही आयुष्यभर मला टारगेट केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील, अशा वावड्या उठविल्या मात्र असे काही घडलेच नाही. लोकसभेच्या निवडणूकीत मतदारांनी शरद पवार यांच्या पक्षाला दिलेला कौल हा गद्दारी विरोधी एक अंडर करंट होता. तो कुणाला लक्षात आला नाही. तो यापुढे ही असेल, असेही आव्हाड म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, कांद्याने वांदे केले. सत्ता गेल्यावर तुम्हाला कळते की कांद्यामुळे वांदे झाले. तुम्ही हे नाही बघत लोक किती मेले, किती आत्महत्या झाल्या. त्याबद्दल तुन्ही काहीच बोलत नाही. कफनवर 18 टक्के जीएसटी घेणारे तुमचे सरकार आहे, अशा शब्दात आव्हाडांनी तटकरेंना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT