Naresh Mhaske, Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : 'जितेंद्र आव्हाडांचे मराठा आंदोलनात दंगे पेटवण्याचे...'; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ

राहुल क्षीरसागर

Thane Political News : शिवसेना (शिंदे) गट आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विस्तव काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता, मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्या वतीने शांततेत आंदोलन सुरु होते. हे आंदोलन कसे पेटेल, त्यातून दंगे कसे घडतील याचे नियोजन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते, असा गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. यामुळे मस्के आणि आव्हाड यांच्या वादाची ठिणगी पडल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. याला आव्हाड काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

शिवसेनेच्यावतीने गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले होते. हे उपोषण मागे घ्यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गेले नाहीत. यावरून संजय राऊतांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.

राऊतांच्या या टीकेला नरेश मस्केंनी समाचार घेतला. ते म्हणाले, 'शिवसेना पक्षाची वाट लावणारे अशी संजय राऊत यांची ओळख आहे. पक्ष संपवण्याची शरद पवार यांची सुपारीच राऊतांनी घेतली आहे. हेच संजय राऊत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कोणत्या भाषेत टीका करत होते, हे आम्हाला माहीत आहे, त्यावर बोलायला लावू नका', असा इशाराही म्हस्केंनी दिला.

'राज्यात मराठा समाजाच्या वतीने शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र आंदोलनाच्या आदल्या दिवशीच्या रात्री नागरिकांची डोकी फिरवण्याचे काम विरोधक करत होते. या आंदोलनात दंगे कसे पेटतील याचे नियोजनच जितेंद्र आव्हाडांनी केले होते', असा गंभीर आरोप म्हस्केंनी केल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे येत्या काही काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, 'आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्रीच सोडवू शकतात, हे जरांगे पाटलांनी सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांची हवाच निघून गेली,' असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Maharashtra Political News)

आदित्य ठाकरे यांच्या शेतकरी संवाद या उपक्रमावरही त्यांनी टीका केली आहे. 'ज्यावेळी हे लोकं सत्तेत होते, त्यावेळी दुष्काळ पडला होता. अशावेळी आदित्य ठाकरे यांनी 'नाईट लाईफ'ची मागणी केली होती. त्यामुळे आदित्य यांचा हा केवळ दिखावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शेतकऱ्यांसाठी गतीने काम करत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे भले होणार' असा दावाही मस्के यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT