Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad Vs Ajit Pawar : 'जागावाटपाची लोकसभेला ही अवस्था असेल तर विधानसभेला काय अवस्था असेल?'

Sunil Balasaheb Dhumal

Thane Political News : प्रत्येक निवडणुकीत कोणता उमेदवार कुठे उभे राहणार त्याचे तिकीट हे शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील व इतर तीन-चार जण निश्चित करत होते. आज मात्र त्यांना कुठली जागा, कुठले तिकीट मिळेल याची शाश्वती नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.

ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आव्हाडांनी उपमुख्यमंत्री पवारांसह भाजपला लक्ष्य केले. लोकसभेला ही अवस्था असेल तर विधानसभेला काय अवस्था असेल. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. प्रत्येक आमदाराने विधानसभेच्या अनुषंगानेच पक्षांतर केले. चार वेळा उपमुख्यमंत्री असूनही पवारांना त्यांच्या गावचा विकास करता आला नाही. मग मंत्री असताना, काय केले, असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला. विकास हे केवळ नावालाच असल्याचे दिसून येते. विकासाच्या नावावर भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि इतर राष्ट्रवादींच्या मंत्र्यांचा आव्हाडांनी समाचार घेतला.

ते म्हणाले भाजपचे आमदार म्हणतात की एवढे बाहेरून आमच्या पक्षात नेते येत आहेत. त्यामुळे, पुन्हा आम्हाला सतरंजी आणि पोस्टर लावायची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे पक्ष निष्ठेला संपविण्याचे काम भाजपने केल्याची टीकाही आव्हाडांनी यावेळी केली. निष्ठा कधी संपत नसते, निष्ठेची ताकद फार मोठी असे म्हणत त्यांनी पवारांना टोला लागावत भाजप नेत्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला.

भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष (BJP) जगात सर्वात मोठा असताना त्याला इतर पक्ष का फोडावी लागतात, हेच समजत नाही. लोकसभेला अर्धे उमेदवार हे तर काँग्रेसचेच आहेत. काही उमेदवार शिवसेनेचे मग तुम्हाला स्वतःची उमेदवार नाही का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस सांस्कृतीत फोडाफोडीचे राजकारण झालेले नाही, पण गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीचे राजकारण हे महाराष्ट्राला अस्वस्थ करणारे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आता हात पसरून मागावी लागते

लोकसभेच्या 12 पैकी दोन जागा मिळाल्या तरी नशीब, असे शिवसेनेच्या (Eknath Shinde) शिंदे गटावर म्हणण्याची वेळ आली आहे. जे हक्काने मिळत होते ते आता हात पसरून मागावे लागते. ठाण्याच्या जागेबाबत संभ्रम निर्माण आहे. ही जागा हक्काचे असताना आम्ही विरोधक असलो तरी ती शिंदे यांनाच मिळाली पाहिजे, असे डिवचून आव्हाडांनी भाजपची एकीकडे खेचायची आणि दुसरीकडे हात कापायचे अशीच पध्दतही असल्याची टीका केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT