Prithviraj Chavan-Sharad Pawar
Prithviraj Chavan-Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Chavan Vs Pawar : अदानीप्रकरणी जेपीसीची मागणी करत पृथ्वीराजबाबांनी शीतपेयांच्या नियमांची पवारांना करून दिली आठवण

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अदानींच्या कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये आले कुठून? जेपीसी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील शस्त्र आहे, ती झालीच पाहिजे. शीतपेयांमध्ये २००३ मध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले होते, त्यासंदर्भात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली जेपीसीची स्थापना झाली होती. या समितीच्या अहवालामुळे आज शीतपेयाबाबतचे नियम कडक आहेत, याची आठवण करून देत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जेपीसीबाबतचे म्हणणे खोडून काढले. (JPC committee's demand of Prithviraj Chavan in Adani case)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडली. त्या बैठकीत आमदार चव्हाण यांनी उद्योगपती गौतम अदानींच्या कंपन्यांमधील गैरव्यवहारप्रकरणी जेपीसी समितीवर पुन्हा भर दिला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, चोरांनाच टार्गेट केले जाते. त्यामुळेच अदानीला हिंडनबर्गने टार्गेट केले. जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती अदानींच्या कंपन्यांतील घोटाळा हिंडनबर्ग अहवालाने बाहेर काढला. टाळेबंदात घोळ करून शेअर्सच्या किंमती कृत्रीमरित्या वाढवून लोकांना फसवले गेले, हे हिंडनबर्ग अहवालाने जगासमोर आणले. हिंडनबर्गच्या अहवालाला अदानी उत्तर देऊ शकले नाहीत, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु शकले नाहीत.

अदानींचे ९ लाख कोटी रूपये पाण्यात गेले. जनतेच्या न्यालयात हिंडनबर्गला न्याय मिळाला. हिंडनबर्ग फ्रॅाड कंपन्यांना टार्गेट करते आणि सत्य बाहेर आणते. राहुल गांधींनी मोदी अदानींचे सत्य जगासमोर आणले. राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिले जात नव्हते. इतिहासात सत्ताधारी पक्षाने कधी लोकसभेचे कामकाज बंद पाडले नव्हते. पण, मोदींच्या काळात ते झाले. राहुलजींचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जंग जंग पछाडले कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवून राहुलजींचा आवाज बंद करण्यासाठीच सदस्यत्व रद्द करण्यात आले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

अदानींच्या कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये आले कुठून? जेपीसी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील शस्त्र आहे, ती झालीच पाहिजे. २००३ साली शीतपेयांमधील कीटकनाशकांचे अंश सापडले होते यासंदर्भात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखासी जेपीसीची स्थापना झाली होती. या समितीच्या अहवालामुळे आज शीतपेयाबाबतचे नियम कडक आहेत, याची आठवणही पृथ्वीराज चव्हाण यांनी करुन दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT