Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Maharashtra Karnataka Dispute : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा…: राज ठाकरेंचा इशारा!

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Karnataka Dispute : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक - महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकादा पेटला आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) व चंद्रकांत पाटील यांचा (Chandrakant Patil) बेळगाव दौरा रद्द झाल्याने राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंकडून (Basavaraj Bommai) सातत्याने सुरू असलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यात आणखीनच भर पडत आहे. अशातच काल बेळगावजवळ (Belgaum) हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना सूचक इशारा दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, ''मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तत्काळ थांबवा''असं ते म्हणाले.

''हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल की त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं''असा इशाराही त्यांनी दिला.

''अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही (Central Govt) ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं''.

''मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे'', असं म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कर्नाटकला इशारा दिला आहे. (Maharashtra Karnataka Dispute)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT