Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election: शिंदे गट आता दोन-चार महिन्यांचा पक्ष..., शिंदे गटाने उमेदवार बदलताच ठाकरे गटाचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाने हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर तिकडे यवतमाळ-वाशीममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde News: महायुतीमध्ये लोकसभेच्या (Lok Sabha) जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेल्या अनेक उमेदवारांना मित्रपक्ष भाजपचा विरोध आहे. त्यामुळे ऐनवेळी शिंदे गटाला आपले उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. शिवाय महायुतीमध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटावर दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिंदे गटाच्या याच राजकीय कोंडीवरून शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.

शिवसेना शिंदे गटाने हिंगोलीतून हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम कोहळीकरांना (Baburao Kadam Kohlikar) उमेदवारी देण्यात आली आहे, तर तिकडे यवतमाळ-वाशीममधून राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाष्य करताना शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'शिंदे गट आता दोन-चार महिन्यांचा पक्ष आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही,' असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माध्यमांशी संवाद साधताना दानवे म्हणाले, "शिंदे गटाला जवळपास भाजपने घेरलं आहे, हेमंत पाटील, भावना गवळी (Bhavana Gawali), कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत. यांना ठाणे आणि कल्याण सहजासहजी मिळत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मिळत नाही, रायगड मागण्याचा प्रयत्न केला. पण यात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे शिंदे गट आता दोन-चार महिन्यांचा पक्ष राहिला आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही."

दरम्यान, भाजपने (BJP) शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचं मांजर बनवून ठेवलं आहे. या दोन्ही गटांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. जे भाजप म्हणेल तेच या लोकांना करावं लागेल. एखाद्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाने ठरवावा, असे महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. शिवाय दानवेंनी विधानसभेपर्यंत शिंदे गट राहणार नसल्याचा दावा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील

शिंदे गटाने हेमंत पाटील यांची उमेदवार बदलल्याची बातमी समोर येताच दानवे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, "शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील."

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT