Mumbai News, 30 Sep : 'महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक आपत्तींचे राजकारण करू नये आणि सरकारन शेवटच्या घटनापर्यंत घोषणा केलेली मदत पोहोचवावी,' अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे. शिवाय महाराष्ट्रावरचे आभाळ फाटले असल्यामुळे सरकारला मदतीसाठी खजिन्याची खिडकी उघडावी लागेल.
मात्र, विरोधी पक्ष काय करतोय? असा मूर्खपणाचा प्रश्न सत्ताधारी विचारत आहेत, अंसंही सामनात म्हटलं आहे. सामनामध्ये लिहिलं आहे की, 'नैसर्गिक आपत्तींचे राजकारण करू नये या मताचे आम्ही आहोत. अर्थात, अशा प्रसंगी राजकीय धूर सत्ताधारी पक्षाकडूनच सोडला जातो. मराठवाड्यात पूरपरिस्थिती पाहायला दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले.
एका शेतकऱ्याने त्यांना 'हेक्टरी किती नुकसान भरपाई देणार किंवा आता लगेच काय देताय ते सांगा,' असे विचारताच शेतकऱ्यावर भडकून मुख्यमंत्री म्हणाले, ''अरे बाबा, गप्प बस. राजकारण करू नकोस.'' आता नुकसान भरपाईची मागणी सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्याने करावी हे काय राजकारण झाले?
मराठवाड्यातील पूरपरिस्थिती अभूतपूर्व आहे. या पुराचे राजकारण फक्त रिकामटेकडे किंवा ठेकेदारांच्या पैशांवर तरारलेले राजकारणीच करू शकतात. या जलप्रकोपात एक कोटीच्या वर शेतकरी फसलेत. शेती, घरे, गुरे वाहून गेली. मनुष्यहानी झालीच आहे. अशाप्रसंगी राजकारणाचा चिखल तुडवण्यापेक्षा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मदतीच्या कार्याला जुंपले आहे.
प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करा, मदत करा अशा त्यांच्या सूचना आहेत. त्याचे नीट पालन झाले तर पुराच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. पूरग्रस्तांसाठी काय करता? असा उफराटा प्रश्न सरकारातील काही बिनडोक उपटसुंभांनी विरोधकांना केला. पूरग्रस्तांना विरोधी पक्ष मदत करणार असेल तर सत्ता उबवणाऱ्यांनी काय त्यांच्या खुर्च्यांतले ढेकूण मारत बसायचे? असा हल्लाबोल सामनातून सत्ताधाऱ्यांना करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांकडे आज अन्नधान्य उरले नाही. छप्पर उरले नाही. त्यामुळे मदत शिबिरांमध्ये जेवण, पाणी आणि आरोग्याच्या बाबत योग्य व्यवस्था राखण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आता या सूचनांचे पालन होते की नाही, हे तपासायचे कोणी? याबाबत सरकारला आमची सूचना आहे. सरकारी मदत वाटपात कोणतेही राजकारण होऊ नये.
महापुराचा फटका बसलेल्या काही जिह्यांत चाराटंचाई आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन चारा पुरवण्याचे आदेश दिले. पावसामुळे धरणातून पाणी सोडले जाते. त्यामुळे पाऊस आणि हे धरणातले पाणी यामुळे गावातला जलप्रलय वाढतो. अशाप्रसंगी गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी काही सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
नुकसानीचे आकडे व माहिती गोळा करा असे आता मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सांगितले. शिवाय मदती संदर्भात खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही हे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. हे सगळे ठीक, फक्त मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि निर्देश यांचे सर्वात शेवटच्या स्तरापर्यंत आणि शेवटच्या पूरग्रस्तापर्यंत पालन व्हावे एवढीच समस्त शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. पावसाचा ‘रेड अलर्ट’ आजही कायम असून एकंदरीत महाराष्ट्रावरचे आभाळ फाटले आहे.
त्यामुळे सरकारला मदतीसाठी खजिन्याची खिडकी उघडावी लागेल. विरोधी पक्ष काय करतोय? हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न मूर्खपणाचा आहे. ‘सरकार पुरात वाहून गेले काय?’ हा प्रश्न पूरग्रस्त शेतकरी कालपर्यंत विचारीत होते. ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?’ असा गुजरात पॅटर्न प्रश्न प्रफुल पटेल यांनी विचारला आहे.
ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती याचा विसर पटेलांना पडलेला दिसतो. आताच्या गंभीर परिस्थितीतही सरकार म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. तशी घोषणा लगेच करा. तुम्हीही ते करू शकता. राजकारण आम्ही करत नाही. तुम्हीही करू नका. शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल. मुख्यमंत्री, जोर लावा!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.