Sharad Pawar recalling Latur experience. Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शरद पवारांनी ‘लातूर’चा अनुभव सांगत टोचले सर्वपक्षीय नेत्यांचे कान; म्हणाले, राज्याचा प्रमुख या नात्याने...

Sharad Pawar recalls Latur experience amid flood review : लातूर भूकंपावेळी पंचनामे व मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्याचा प्रमुख ह्या नात्याने मी लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Rajanand More

Maharashtra floods 2025 : महाराष्ट्रात अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले असून त्यांची भेट घेण्यासासाठी, नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेत्यांचे दौरे सुरू आहे. प्रामुख्याने मागील दोन दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह बहुतेक सर्वच पक्षातील नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा केला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे कान टोचले आहेत.

शरद पवार यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पिडीतांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची अतोनात गर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांना केली होती विनंती

शरद पवार यांनी लातूर भूकंपावेळीचा आपला अनुभव सांगितला. लातूर भूकंपावेळी पंचनामे व मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्याचा प्रमुख ह्या नात्याने मी लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले, एवढेच नव्हे तर इतर नेते व दस्तुरखुद्द प्रधानमंत्र्यांना देखील काही दिवस भूकंपग्रस्त भागात दौरा करू नयेत, अशी विनंती केली होती, अशी आठवणही पवारांनी सांगितली.

अतिरिक्त यंत्रणेची गरज

शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा व्याप पाहता पंचनामे वेळेत करुन योग्य मदतकार्य सुरु व्हावे यासाठी आपत्तीग्रस्त भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त मनुष्यबळ व महसूल, कृषी, पाटबंधारे व इतर शासकीय अधिकारी यंत्रणा तातडीने पाचारण करणे आवश्यक आहे. मी राज्याचा प्रमुख असताना मुंबई बॉम्बस्फोट, लातूरचा भुकंप यासारखी अस्मानी-सुलतानी संकटाची परिस्थिती जवळून पाहिली आणि हाताळली आहे, असे शरद पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.  

प्रशासनाचे कौतुक

अशा भयानक संकटात सापडलेली हजारो घरे व कुटूंबे पुन्हा उभी करण्यासाठी शासकीय यंत्रणेचे योगदान मोलाच होतं आणि अशा प्रसंगी शासकीय कर्मचारी स्वतःला झोकून देऊन काम करतात, हे महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणेनं अनेकदा सिद्ध केलेलं आहे. फक्त तिच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. या प्रसंगी राज्यसरकार पिडीतांना दिलासा देण्याचे, त्यांना पुन्हा सक्षम करण्याचे काम करेल, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT