MLC Election 2024 Sarkarnama
मुंबई

Maharashtra MLC elections : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी, कुणाचे '12' वाजणार?

Akshay Sabale

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार याचीच उत्सुकता ताणली गेली आहे.

सर्वच पक्षांना आपली मते फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यावर भर देण्यात आला आहे.

'12' जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ( Maharashtra Legislative Council elections ) 11 जागांसाठी '12' उमेदवार मैदानात आहेत. म्हणजेच पडणारा '12 वा' उमेदवार कोण असून महायुती की महाविकास आघाडी कुणाचे '12' वाजणार याची चर्चा सुरू आहे. 2022 मध्ये सरकार असतानाही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडत भाजपनं धनंजय महाडिक यांना निवडून आणलं होतं. आतातर महायुती सत्तेत आहे, त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतांची फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस ( Congress ) वगळता कोणत्याच पक्षाकडे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते नसल्यानं 'घोडेबाजार' मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसची 3 ते 4 मते फुटतील, असा आरोप शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मतांचं गणित कसं?

पाचही उमेदवार निवडून येण्याचा विश्वास भाजपला ( Bjp ) आहे. तरी, पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार मैदानात आहे. त्यांच्याकडे 39 आमदार असून त्यांना 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्यानं त्यांचा कोणतं 'टेन्शन' नाही. शेकापचे जयंत पाटील यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटानं पाठिंबा दिला असून त्यांचे 15 आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे 16 मते आहेत. आणखी सात मतांची जुळवाजुळव त्यांना करावी लागेल.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 15 आमदार आहेत. त्यांना आणखी 8 मते लागतील. एक अपक्ष आमदाराचा त्यांना पाठिंबा आहे. अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत. त्यांना आणखी सात मतांची आवश्यकता आहे. अपक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचं समीकरण जुळू शकते, असं बोललं जातं.

काँग्रेसकडे 37 मते आहेत. त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ 23 मते लागणार आहेत. त्यामुळे काँग्रेससकडे 14 अतिरिक्त मते आहेत. ती मते कुठे वळतात यावर बरेच गणित अवलंबून आहे.

तर, काँग्रेसच्या अतिरिक्त मतांबरोबर शिंदे गटातील मतांवरही मिलिंद नार्वेकर यांचं लक्ष आहे. काँग्रेसची मते फुटणार असल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील पाटील यांनी केला आहे. काँग्रेसनं अतिरिक्त मते पाटील यांना देण्यास नकार दिल्यानेच पाटील यांनी जाहीर आरोप केल्याचं काँग्रेस नेत्यांचं मत आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अखेरीच संधी असल्यानं मोठ्या प्रमाणावर 'लक्ष्मी'चं दर्शन होऊ शकते.

रिंगणात कोण?

भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर

शिवसेना ( शिंदे गट ) : भावना गवळी, कृपाल तुमाने

राष्ट्रवादी ( अजित पवार ) : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे

काँग्रेस : प्रज्ञा सातव

शिवसेना ( उद्धव ठाकरे ) : मिलिंद नार्वेकर

शेकाप : जयंत पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT