Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : राज्यात तिसऱ्या भूकंपाची शक्यता; 'या' कारणामुळे खातेवाटप आणि विस्तार रखडल्याची चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Cabinet Expansion And Politics : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटून राज्यात वर्षातच दुसरा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यास आता ११ दिवस झाले तरी त्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. दरम्यान, मंत्रिपदाची आशा लागलेले शिवसेना आणि भाजपच्या आमादारांध्येही नाराजी पसरली आहे. राज्यात अशी स्थिती असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते देण्यास शिवसेनेच्या आमदारांचा तीव्र विरोध असल्याने खातेवाटप रखडल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेस पक्षाचाही एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहे. या गटामुळेच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडल्याची माहिती आहे. काँग्रेसचा हा गट सरकारमध्ये आल्यास त्यांना कुठली खाती द्यायची, यावर सध्या मुंबई आणि दिल्ली पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते आहे. यामुळेच ११ दिवस झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप केले नाही. तसेच मंत्रिमंडळ विस्तारालाही हेच कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्य सरकारमध्ये आता काँग्रेसमधील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा सहभाग होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. १२) दिल्ली येथे भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल आणि मंत्री हसन मुश्रीफही होते. त्यांच्यात तासभर बंददाराआड चर्चा झाली. त्यानंतर आज गुरुवारी (ता. १३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरा भूकंप होण्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे.

दरम्यान, फुटीच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांशी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी संवाद साधला आहे. यामुळे काहींचे मनपरिवर्तन झाले असले तरी काहीजण भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते आहे. यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय चित्र नेमके कसे असेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान होणाऱ्या घडामोडींकडे मात्र राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपचा डोळा काँग्रेसवर असल्याचे विधान केले होते. अपक्ष आमदार आणि मंत्रिपदासाठी इच्छूक बच्चू कडू यांनींही काँग्रेस लवकरच सरकारमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचे लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सर्व पावले उचलण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यानंतरच आता काँग्रेसची वेळ अशीही चर्चा सुरू झाली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT