Mumbai : राष्ट्रवादीत बेकी झाल्यानंतर विस्कटलेल्या महाविकास आघाडी ऐकी टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे हे कामाला लागले आहेत. शिवसेनेला साथ देणाऱ्या 'वंचित'ला महाविकास आघाडीत समावून घेण्याच्या हालचाली ठाकरेंनी वेगाने सुरू केल्याचे त्यांच्या बोलण्यातून उघड झाले आहे.
दोन्ही काँग्रेस नव्याने संवाद घडवून आघाडीसोबत 'वंचित'ला घेतले जाऊ शकते, त्याआधी वंचितकडून जागा वाटपाबाबतचा प्रस्ताव मागवून त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चां केली जाण्याची शक्यता आहे. "मी प्रकाश आंबेडकरांना विनंती केली आहे की, तुमच्या मनात नेमकं काय आहे? काहीतरी प्रस्ताव, त्याचा मला अंदाज येऊ द्या… तसा प्रस्ताव तुम्ही मला दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू," असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहूजन आघाडीसोबत युती केली आहे, पण महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनीही अद्यापही वंचित बहूजन आघाडीचा समावेश मविआमध्ये करुन घेतलेला नाही. 'मविआ''वंचित'ला सामावून घेणार का ? असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर उद्धव ठाकरेंनी गुरुवारी वंचित बहूजन आघाडीच्या युतीबाबत भाष्य केले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकरेंनी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी प्रस्ताव द्यावा, असे सांगितले. "प्रकाश आंबेडकरांशी माझा माझा संवाद अद्यापही सुरु आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीतील घडामोड घडली. त्याआधी महाविकास आघाडीच्या सभा सुरू होत्या.या सगळ्यात प्रत्यक्ष बोलणी झालेली नाहीत. मात्र मी त्यांना विनंती केली आहे की, तुमच्या मनात नेमकं काय आहे? काहीतरी प्रस्ताव, त्याचा मला अंदाज येऊ द्या… तसा प्रस्ताव तुम्ही मला दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू,"
"राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील समीकरणे बदलली आहेत. त्यावेळेचे वातावरण, आताचे वातावरण वेगळे आहे. पुन्हा या सगळ्यांशी बोलून त्यांचा प्रस्ताव काय आहे, आपण काय करू शकतो? यावर चर्चा करता येईल. अजूनही जागावाटप कुठेच कोणाचेही झालेले नाही.प्रकाश आंबेडकरही तसा प्रस्ताव तयार करतील. तो प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल. मला खात्री आहे, ते सोबत राहतील,"
"महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्याचंच रूपांतर आता देशभरात ‘इंडिया’ नावानं झालंय म्हणून इतर राज्यांतले जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यात काँग्रेस मोठा पक्ष आहेच, इतर सर्व पक्ष त्यात सामील झाले आहेत. कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे," असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.